Soybean Crop Loss affects Farmer Income: खरिपातील महत्त्वाचे सोयाबीन पीक दुष्काळाच्या फेऱ्यात सापडले आहे. राज्यातील सोयाबीन पट्ट्यात ऑगस्टमध्ये ५० ते ८० टक्के कमी पाऊस झाला. सप्टेंबरचा पहिला आठवडाही कोरडाच गेला. मध्य प्रदेशातही सोयाबीन उत्पादक भागात पावसातील तूट ३० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान आहे. देशातील ८० टक्के सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या या दोन्ही राज्यांमध्ये ऐन फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या काळात पाऊस नसल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. .सोयाबीनचे पुढे काय होणार? हा प्रश्न जसा शेतकऱ्यांना तसा बाजारालाही आहे. कारण सोयाबीन लागवडीच्या आधीपासूनच पिकाचे काय? या प्रश्नाभोवती बाजार फिरत राहिला आहे. सध्या बाजारात प्रतिक्षा आहे ती उत्पादकतेच्या आकड्यांची. सोयाबीन बाजार मे आणि जून महिन्यात हंगामातील उच्चांकी ७५०० हजारांपर्यंत पोचला होता. जुलै महिन्यात कमी पावसावर पेरण्या झाल्या..जुलैच्या शेवटी आणि ऑगस्ट पहिल्या आठवड्यात पाऊस झाला. सोयाबीन पीक तरारले आणि वाढही चांगली झाली. केवळ सोयाबीन पिकाची हिरवी पाने पाहून बाजारात चांगल्या उत्पादनाच्या शक्यतेने भाव कमी झाला. सध्या सोयाबीन ५,५०० ते ६ हजारांच्या दरम्यान आहे. पिकाची बिकट परिस्थिती असतानाही भाव स्थिर आहेत, कारण नवा हंगाम तोंडावर आहे आणि नेमके उत्पादन किती राहील? याचा अंदाज येत नाही..Soybean Crop Damage: पावसाअभावी सोयाबीन मोडण्याची वेळ.भारताच्या २०२६-२७ मधील सोयाबीन उत्पादनाचा पहिला अंदाज ‘युएसडीए’ने दिला. ‘युएसडीए’ने ऑगस्टची परिस्थिती लक्षात घेऊन उत्पादन १० टक्क्यांनी घटण्याचे संकेत दिले. त्यानंतर मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी बिकट झाली. देशातील सोपा आणि इतर संस्थांनी अद्याप अंदाज दिला नाही. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चित्र स्पष्ट होईल. यापूर्वी २०१५-१६ मध्ये ‘एल निनो’मुळे उत्पादन ८७ लाख टन झाले होते..यंदाही याच्या आसपास उत्पादन राहील अशी शक्यता काही बाजार अभ्यासक सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन व्यक्त करत आहेत. पण सोयाबीन हाती येत नाही तोपर्यंत नेमका कोणता अंदाज खरा ठरणार, हे सांगता येत नाही. तरीही देशातील सोयाबीन बाजार कमी उत्पादनामुळे चांगला राहील, अशी दाट शक्यता आहे..परंतु नवा माल बाजारात येतो तेव्हा भाव विविध कारणांनी कमी केले जातात. या काळात शेतकऱ्यांनी हाती आलेल्या सोयाबीनची सावधपणे विक्री करणे गरजेचे आहे. कारण कमी उत्पादनामुळे आधीच कोलमडलेले अर्थकारण त्यात बाजारातील चलाखी आणि सरकारच्या बेभरवशी धोरणांची टांगती तलवार असणार आहे..Soybean Crop Crisis: पश्चिम विदर्भातील ९ लाख हेक्टरवरील सोयाबीन संकटात.देशात उत्पादन कमी होण्याचा अंदाज असला तरी जागतिक पातळीवर उत्पादन विक्रमी पातळीवर पोचण्याची शक्यता आहे. कारण ब्राझील आणि अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादक भागात ‘एल निनो’च्या वर्षात चांगला पाऊस होतो. आता या दोन्ही देशांमध्ये लागवडी सुरु होणार आहेत आणि उत्पादन वाढीचा अंदाज आहे. असे झाल्यास खाद्यतेलासाठी सोयाबीनचे गाळप वाढून सोयापेंडची उपलब्धता वाढू शकते..याचा परिणाम सोयापेंड बाजारावर दिसू शकतो. देशात जीएम सोयापेंड आयातीला परवानगी नाही. त्यामुळे उत्पादन कमी राहून सोयापेंड आणि सोयाबीनचे भाव चांगले राहण्याची शक्यता आहे. पण सरकारच्या आयात धोरणाची टांगती तलवार कायम असेल. कारण यापूर्वी सरकारने देशातील भाव वाढल्यानंतर जीएम सोयापेंड आयात केलेली आहे. केंद्र सरकारने २०२१ मध्ये १५ लाख टन जीएम सोयापेंड आयातीला परवानगी दिली होती. यामुळे देशात भाव कोसळले होते. यंदा सरकारला अशी दुर्बुद्धी सुचू नये, म्हणजे झालं..थोडक्यात, देशातील सोयाबीन उत्पादन घटल्यामुळे भाव चांगले राहतील. परंतु शेतकऱ्यांसाठी खर्च आणि उत्पादन कमी झाल्यामुळे हंगाम आतबट्याचाच ठरणार आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या मदतीचा आणि आयातीला रोखणाऱ्या धोरणांचा पाठिंबा आवश्यक आहे. अन्यथा `एल निनो’चे चटके बसतच आहेत. त्यात सरकारच्या धोरणांचे चटके शेतकरी सहन करू शकणार नाहीत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.