Monsoon Management: देशातील धरणांमध्ये सध्या गेल्या वर्षीच्या तसेच मागील दहा वर्षांच्या तुलनेत १०० टक्क्यांहून अधिक पाणी आहे. जमिनीतील आर्द्रताही अधिक नोंदली गेली आहे. शिवाय उन्हाळी पिकांचा पेराही गेल्या वर्षीपेक्षा अडीच लाख हेक्टरहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात, हे सर्व गेल्या मॉन्सूनमध्ये अधिक पाऊसमानाचा परिणाम आहे, हे नाकारता येत नाही. एकंदर ही अशी परिस्थिती असताना आगामी मॉन्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. एल निनो स्थिती म्हणजे कमी पाऊसमान, असा त्याचा सर्वसाधारण अर्थ होतो. .आणि कमी पाऊसमान म्हणजे शेतकऱ्यांपासून ते शासनापर्यंत सर्वांच्याच चिंतेत वाढ, हे एक समीकरणच होऊन बसले आहे. कमी पाऊसमानाचा अंदाज असेल तर चिंता करीत बसण्यापेक्षा सर्वांनीच त्यात तग धरण्याच्या उपाययोजनांवर आतापासून काम करायला हवे. एल निनोच्या वर्षात देखील आपल्याकडे चांगला पाऊस झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिवाय दूरच्या एल-निनोपेक्षा आयओडीसह आपल्या जवळच्या इतर स्थानिक घटकांचा मॉन्सूनवर अधिक प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे मॉन्सूनचे आगमन, त्याचे वितरण, परतीचा पाऊस या प्रत्येक टप्प्यांवर स्थानिक वातावरण कसे राहणार त्यानुसार पाऊस पडणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे..India Monsoon 2026: देशावर कमी पावसाचे सावट.पाऊस जास्त म्हणजे भरघोस उत्पादन आणि पाऊस कमी म्हणजे कमी उत्पादन असाही थेट संबंध लावता येत नाही. अधिक पाऊसमान काळात पूर तसेच शेतात पाणी साठून पिकांचे नुकसान होऊन उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचा अनुभव राज्यातील शेतकरी मागील दोन वर्षांपासून घेत आहेत. तर कमी पाऊसमान काळात भरघोस सुगी पिकल्याचे देखील अनेक दाखले आहेत. त्यामुळे मॉन्सूनचा पाऊस किती पडतो यापेक्षा तो कधी, कुठे, कसा पडतो आणि पडलेल्या पावसाचे नेमके काय होते, यावर पिकांचे उत्पादन अवलंबून असते..पाऊस पडल्यानंतर पाण्याचा निचरा प्रामुख्याने तीन प्रकारे होतो. पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते, मातीत मुरते किंवा मातीत मुरण्यापूर्वीच बाष्पीभवनाद्वारे निघून जाते. जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे मातीची मोठ्या प्रमाणावर धूप होते. अतिवृष्टीमध्ये मातीबरोबर अनेकदा पिकेही वाहून जातात. हे पाणी शेतपिकांना नुकसानकारकच ठरते. पावसाचे जे पाणी मातीत मुरते तेही पिकांना पूर्णपणे उपलब्ध होत नाही. यातील काही पाण्याचे बाष्पीभवन होते..Monsoon Arrival 2026 : एल-निनो २०२७ च्या जानेवारीपर्यंत टिकून राहण्याचा अंदाज; मे महिन्यात उष्णतेच्या लाटा वाढणार?.बाकीचे पाणी जमिनीत खोलवर जाते, त्याचाही पिकांना उपयोग होत नाही. यातून उरलेले जे पाणी पिकांची मुळे शोषून घेतात त्यातीलही काही पाणी पानांद्वारे बाष्पोत्सर्जनाने निघून जाते. शिवाय मातीतील कलील (कोलाइड्स) पाणी धरून ठेवतात आणि ते पाणी सुद्धा पिकांना उपलब्ध होत नाही. यावरून आपल्या लक्षात आले असेल की पडलेल्या पाण्यापैकी फारच थोडे पाणी प्रत्यक्षात पिकांना मिळते..पाणी वाहून जाण्याला देखील केवळ पावसाचे प्रमाण व जोरच कारणीभूत आहे, असे नाही, तर जमिनीतील पिके, जमिनीचा प्रकार आणि मशागतीची पद्धत यावरून ते ठरते. या सर्व बारकाव्यांचा अभ्यास करून आगामी कमी पाऊसमान काळात विभागनिहाय मातीचा प्रकार, पीकपद्धती, मशागत पद्धतीनुसार शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हायला हवे. शिवाय पडलेले अधिकाधिक पाणी जमिनीत मुरायला हवे..मुरलेले जास्तीत जास्त पाणी पिकांना उपलब्ध होईल, ही काळजीदेखील घ्यावी लागेल. त्याकरिता प्रत्येक शेतामध्ये मूलस्थानी जलसंधारणाच्या कामांवर भर द्यावा लागेल. प्रत्येक पाणलोट क्षेत्रात माथा ते पायथा मृद्-जलसंधारणाची कामे आतापासून करावी लागणार आहेत. शेतकरी ते शासन पातळीवर याकडे दुर्लक्ष झाले अन् आगामी मॉन्सूनमध्ये कमी पाऊस झाला, तर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.