Strict Regulation for Agri Markets: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोट्यवधींच्या बाजार शुल्क (सेस) चोरी रोखण्यासाठी प्रशासनाला फारच उशिरा जाग आली असून, त्यांनी आता यासाठी धडक कारवाई देखील सुरू केली आहे. खरे तर मुंबई बाजार समितीमध्ये सुमारे ८० टक्क्यांपर्यंत सेस चोरी होत असल्याचा निष्कर्ष या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीने जुलै २०२५ मध्ये काढला होता. त्यानंतर सुमारे १० महिन्यांनी मापाड्यांना आता थेट गाळ्यावर उपस्थित राहून शेतीमालाच्या वजनाची नोंद घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. .शिवाय असे न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होते की नाही, किती प्रभावीपणे होते, यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. बाजार समित्यांमधील सेस चोरी हे काही नवीन प्रकरण नाही. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये वर्षानुवर्षांपासून सेस चोरी सुरू आहे. राज्यात एकूण ३०६ बाजार समित्या आहेत. या बाजार समित्यांची प्रत्यक्षात एकूण उलाढाल दोन लाख कोटींची असल्याचे अनेक अभ्यासक सांगतात..APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला.मात्र बाजार समित्यांची उलाढाल ही ५० ते ६० हजार कोटींची दाखविली जाते. त्यामुळे बाजार समित्यांना दोन हजार कोटी रुपये सेसच्या माध्यमातून उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६०० कोटींचेच उत्पन्न मिळते. यावरून सेस चोरीच्या व्याप्तीचा अंदाज आपल्याला यायला हवा. पुणे, मुंबई असो वा राज्यातील कोणतीही बाजार समिती सेस चोरीच्या रॅकेटमध्ये व्यापारी अडत्यांबरोबर, बाजार समिती संचालकांबरोबर प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी हे देखील त्यात सामील असतात..बाजार समित्यांमधील सेस चोरी तसेच इतरही अनेक प्रकारे शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबविण्यासाठी मॉडेल ॲक्टपासून नियमनमुक्तीपर्यंत अनेक सुधारणा करण्यात आल्या. परंतु त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे चोरी, लुटीचे वेगवेगळे पर्याय बाजार समितीतील प्रस्थापित घटक शोधत असतात आणि त्यात ते यशस्वीही होतात. ठरावीक शेतीमालाच्या वाहनांची नोंद न करता काही व्यापारी परस्पर विक्री करून सेस बुडवितात..APMC Cess Controversy: सेस रद्द केल्यास बाजार समित्यांना टाळे लागतील.cएखाद्या ट्रकमध्ये काजू, पिस्ता असा उच्च किमतीचा माल असला, की ज्वारी-बाजरी आहे म्हणून दाखविले जाते. अर्थात, प्रत्यक्षात २५ लाखांचा व्यवहार होत असताना एक दीड लाखाचा दाखवून तेवढा सेस चोरी केला जातो. बाजार समित्यांमधील सेस चोरी थांबविणे, त्याचे रॅकेट्स उद्ध्वस्त करणे हे काही फार कठीण काम नाही. आयकर विभागासारखी (इनकम टॅक्स) यंत्रणा आपल्या घरी कधी येत नाही, आपल्याला काही विचारपूस देखील करीत नाही. परंतु प्रभावी ऑनलाइन यंत्रणेद्वारे या विभागाने केवढा वचक निर्माण केला आहे..त्यामुळे बहुतांश जण नियमित आयकर भरतात. बाजार समित्यांतील सेस चोरीवर देखील सहज प्रभावी नियंत्रण ठेवले जाऊ शकते, त्यासाठी गरज आहे ती दंड आणि शिक्षा अशा कठोर कारवाईबरोबर संनियंत्रण पद्धतीत व्यापक बदलाची! सेस चोरीसह बाजार समित्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल तसेच पणन सचिव, पणन संचालक यांनी कंबर कसली आहे, असे बोलले जातेय..प्रशासनाने याबाबत धडक कारवाईची व्यापक मोहीम हाती घ्यायला हवी. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी लागेल. बाजार समितीत येणाऱ्या सर्व शेतीमालाची रीतसर नोंदणी झाली पाहिजे. नोंदणी रेकॉर्ड दररोज तपासले गेले पाहिजे. ठरावीक काळाने बाजार समित्यांचे ऑडिट सरकारी यंत्रणेद्वारे नाही तर त्रयस्थ यंत्रणेद्वारे व्हायला हवे. मुंबई, पुणे बाजार समित्यांबरोबर राज्यभर हे काम झाले तरच सेस चोरींची रॅकेट्स उद्ध्वस्त होऊन हे प्रकार थांबतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.