Loan Waiver Announcement: राज्यात गेल्या सात वर्षांत तीन वेळा कर्जमाफी झाली, ही शेतकऱ्यांसाठीची चौथी कर्जमाफी आहे. परंतु अजूनही कर्जमाफीसाठीच्या नेमक्या अटी-शर्थी काय राहतील, शिवाय त्याची अंमलबजावणी कशी करायची, याची नीट घडी बसलेली नाही..खरिपाच्या तोंडावर कर्जमाफीसारख्या घोषणेने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला. परंतु त्यातील जाचक अटी-शर्थी, अंमलबजावणीची संथ आणि किचकट प्रक्रिया पाहता हा दिलासा फार काळ टिकला नाही. वास्तविक पाहता हा खरीप अनेक मार्गांनी शेतकऱ्यांची परीक्षा पाहतोय. ‘एल निनो’मुळे पावसाचे आगमन लांबले. पेरणीनंतर पावसाने तब्बल १५ दिवसांची दडी मारली. पेरण्या खोळंबल्या, कमी पाऊस, निकृष्ट बियाणे यासह इतरही काही कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली. त्यातच यंदा कर्जमाफीच्या घोषणेमुळे पीककर्जाचा वेगही मंदावला आहे. .Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा.राज्यात उद्दिष्टाच्या केवळ ५६ टक्के पीककर्ज वाटप झाले. बहुतांश शेतकऱ्यांना उसनवारी, पदरमोड करून पेरण्या कराव्या लागल्या. कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातील शेतकरी प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी आतुर झालेले असताना केवळ ५३३ शेतकऱ्यांची मुहूर्ताची यादी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केली. प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची माहिती मिळाली नसल्यामुळे पुढील याद्यांना विलंब लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुहूर्ताची यादी देखील अंतिम नाही. या ५३३ शेतकऱ्यांची पुनर्तपासणी करून नाबार्डच्या परवानगीने त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. अर्थात, मुहूर्ताच्या ५३३ शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी वगळलेदेखील जाऊ शकतात. असे झाले तर ‘मुहूर्तालाच ग्रहण’ लागले, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही..राज्यातील ५६ लाख ४० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार असून, ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असले तरी ३९ लाख २४ हजार म्हणजेच ७० टक्के शेतकरी अटी-शर्थीच्या आडून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले होते. याला जोरदार विरोध झाल्यामुळे २०१९ला कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या व पुन्हा २०२६मध्ये पात्र ठरलेल्या १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांचे कर्ज ५० हजारांऐवजी २ लाखांपर्यंत माफ करावे लागले. नियमित २३ लाख ६३ हजार शेतकऱ्यांसाठी सन २०२६-२७ मध्ये कर्ज फेडण्याची अट काढून टाकावी लागली. .Farm Loan Waiver: कर्जमुक्ती : अटीशर्ती अन् संघर्ष.यामुळे एकूण ३६ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु नियमित कर्जदारांना ५० हजार प्रोत्साहन अनुदानाऐवजी इतरांप्रमाणेच २ लाखांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी प्रलंबित आहे. याबाबत नियमित कर्जभरणा करून आम्ही चूक केली का, अशी तीव्र भावना या शेतकऱ्यांची आहे. नियमित कर्जपरतफेड करणारे शेतकरी सलग तीन वेळा कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत आहेत. अशा वेळी त्यांच्या भावनांचा देखील सकारात्मक विचार व्हायला हवा. .सेवा सहकारी सोसायट्या, बॅंका यांच्याकडून कर्जखात्यांची माहिती एकत्र केली जातेय, ती माहिती लेखापरिक्षकाकडून तपासली जात आहे. यातून करदाते शेतकऱ्यांना वगळण्यात येईल. त्यानंतरच्या यादीवर संगणकीय संस्करण करून कर्जमाफीची पहिली अधिकृत यादी ३० जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पोटलीतून नेमके काय बाहेर येणार, यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. .कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकरी पुन्हा या दुष्टचक्रात अडकू नयेत म्हणून उपाय योजनांसाठी ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना करण्यात आली होती. ह्या समितीचे नेमके काय चालले, याबाबत अजून काहीही स्पष्टता नाही. कर्जमाफीबरोबर कर्जातून मुक्तीच्या उपाययोजनांची देखील अंमलबजावणी झाली पाहिजे. अन्यथा कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी होण्यास वेळ लागणार नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.