Indian Trade Policy: ‘मेरा जुता है जापानी’ हे गीत १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्री ४२०’ या चित्रपटातील आहे. त्या वेळी भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळून प्रजासत्ताक लोकशाही भारतात रुजत होती. जगातील प्रमुख देशांबरोबर राजकीय तसेच व्यापारी संबंध नव्याने प्रस्थापित करण्याचा तो काळ होता. अशा काळात वसाहतवादी प्रभावातून बाहेर पडत व्यापारात व्यापक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या गाण्याने दाखविला होता. .गाण्याचे बोल काल्पनिक असतात हे खरे आहे. परंतु तेव्हापासून आजतागायत जपान सोबत आपले व्यावसायिक संबंध अपेक्षित स्तरावर पोहोचले नाहीत. अशा वेळी पुढील दहा वर्षांत जपानने भारतात दहा ट्रिलियन येन (दहा अब्ज डॉलर) गुंतविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही गुंतवणूक संरक्षण क्षेत्राबरोबर एआय तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रात होणार आहे. भारत-जपान कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) उपक्रमाची घोषणाही करण्यात आली आहे..भारत आणि जपान या दोन देशांचा व्यापार २७.४७ अब्ज डॉलरचा असून त्यात जपानचा दबदबा दिसतो. जपानमधून भारतात होत असलेली निर्यात ही २१.४३ अब्ज डॉलरची असून, त्या तुलनेत भारतातून जपानला होत असलेली निर्यात खूपच कमी (६.०६ अब्ज डॉलर) आहे. आपला देश जपानमधून तांबे, स्टील, लोखंड या धातूंबरोबर न्यूक्लिअर रिॲक्टर, इलेक्ट्रिक यंत्रे याची प्रामुख्याने आयात करतो. तर जपानला आपण वाहने, वाहनांचे सुटे भाग, ॲल्युमिनिअम आणि सागरी उत्पादने निर्यात करतो..Middle East Conflict: युद्ध, ‘एल निनो’ आणि भारतीय शेती.आता जपान आपल्या देशात इलेक्ट्रिकल वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरी, ग्रीन हायड्रोजन, सीबीजी निर्मिती तसेच अणुऊर्जा क्षेत्रात प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहे. भारत आणि जपान यांच्यात स्वच्छ ऊर्जेबाबतच्या सहकार्याला सुरुवात २०२२ मध्येच झाली. त्याचीच ही पुढची कडी म्हणावी लागेल. संपूर्ण जगच आता जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हरितऊर्जेवर लक्ष्य केंद्रित करीत आहे. वाहन उद्योगानंतर भारताने देखील देशातील खत निर्मिती, तेल शुद्धीकरण, लोह व पोलाद उद्योग, रसायने निर्मिती अशा क्षेत्रात हरित हायड्रोजनचा वापर करण्याचे निश्चित केले आहे..Indian Agriculture: युद्धसमाप्तीच्या घोषणेमुळे भारतीय शेतीला दिलासा; खते, इंधन, निर्यात खर्च कमी होण्याची शक्यता.सीबीजी तसेच हरित हायड्रोजन निर्मितीमध्ये देशातील साखर उद्योगाला चांगला वाव आहे. साखर कारखान्यांतील प्रेसमड हा सीबीजीसाठी सर्वोत्तम कच्चा माल मानला जातो. याशिवाय शेण, सिवेज-सॉलिड वेस्ट, शेतातील काडीकचरा, पिकांचे टाकाऊ अवशेष, कागद गिरणीचा कचरा हा कच्चा माल देखील सीबीजी निर्मितीसाठी वापरला जाऊ शकतो. परंतु हे तंत्र किचकट आणि खर्चिक आहे..त्यामुळे अफाट भांडवल असलेले काही मोजके उद्योग या क्षेत्रात गुंतवणूक करून पुढे जाण्याची भीती सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात आहे. जपानच्या होणाऱ्या गुंतवणुकीने ही भीती वाढणे साहजिक आहे. अशा वेळी जपानच्या गुंतवणुकीचा लाभ काही मोजक्या कंपन्यांऐवजी देशातील साखर उद्योगाला होईल, हेही पाहावे लागणार आहे..‘एआय’ला गती देण्यासाठी जपानी तंत्रज्ञान आणि भारतातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील ताकद एकत्र आल्यास दोन्ही देशांना याचा फायदाच होणार आहे. भारतातील आर्थिक स्थैर्य, वाढती बाजारपेठ, मोठा ग्राहकवर्ग, स्वस्तात उपलब्ध मनुष्यबळ आणि नव्या गुंतवणुकीच्या संधीमुळे जपानी कंपन्यांचा भारताकडे कल वाढत आहे..जपानच्या भारतातील गुंतवणुकीने जपानी कंपन्यांची सध्याची संख्या पुढील दशकभरात दुपटीने वाढणार आहे. सध्या भारतात काम करणाऱ्या जपानी कंपन्यांपैकी केवळ एक टक्के कंपन्यांचा व्यवसायात निम्म्याहून अधिक वाटा आहे. नव्याने देशात येणाऱ्या कंपन्यांमध्ये असा एककेंद्री व्यवसायात वाटा राहणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल. जपानच्या या बूस्टरने दोन्ही देशांतील व्यावसायिक संबंध अधिक सुदृढ आणि गतिमान होवोत, हीच अपेक्षा!.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.