HTBT Cotton Seeds Crisis: पिकाची लागवड करण्यापासून ते पीक शेतात किती दिवस ठेवायचे यावर बंधन असणारे देशातील एकमेव पीक म्हणजे कापसाचे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बीटी कपाशीवर मागील दशकभरापासून गुलाबी बोंड अळीचा उद्रेक होतोय. या किडीचे प्रभावी नियंत्रण मिळविण्यात अपयश आल्याने शेवटी त्या पिकाची लागवड व पीक कालावधी यावरच मर्यादा आणल्या गेल्या आहेत. .यात सर्वाधिक कोंडी ही उत्पादकांची होत आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या कृषी विभागाने खरीप हंगाम २०२६-२७ साठी बीटी कापूस बियाण्याच्या किमतीत कोणताही बदल केला नसल्याची अधिसूचना जारी केली. त्यामुळे या हंगामात बोलगार्ड-२ चे ४५० ग्रॅमचे बियाणे पॅकेट शेतकऱ्यांना ९०० रुपये दराने मिळतील..Illegal HTBT Cotton Seeds: अवैध कापूस बियाण्यामागे गुजरात कनेक्शन.बियाणे दर ‘जैसे थे’ ठेवून कापूस उत्पादकांना मोठा दिलासा देण्याचा केंद्र सरकार कितीही आव आणत असले तरी मुळातच हे दर बियाणे उत्पादन खर्चाच्या तुलनेत खूप जास्त आहेत. बीटी बियाणे उत्पादनासाठी कंपन्यांना जेमतेम प्रति किलो ६०० ते ७०० रुपये खर्च येत असताना त्याची विक्री मात्र दोन हजार रुपये किलोने करून कंपन्या घसघशीत नफा कमावत आहेत..दुसरीकडे बीटी बियाण्यांमुळे फवारण्यांवरील खर्च कमी करून उत्पादनात वाढ हा कंपन्यांचा दावाही मागील अनेक वर्षांपासून फोल ठरत आहे. बीटी कापसावर गुलाबी बोंड अळीसह इतरही अनेक रोग किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादनखर्च वाढला आणि उत्पादकता घटली आहे. अशा वेळी महागडे बीटी बियाणे खरेदी करून त्याची लागवड का करायची, असा प्रश्न उत्पादकांसमोर आहे..राज्यात पाण्याची सोय असलेले शेतकरी प्रामुख्याने खानदेश तसेच विदर्भ, मराठवाड्यात हंगामपूर्व कापसाची लागवड करतात. हंगामपूर्व कपाशीची लागवडीमुळे गुलाबी बोंड अळीसह इतर कीड-रोगांचा प्रादुर्भाव टळून उत्पादन अधिक मिळते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. दुर्दैवी बाब म्हणजे या लागवड प्रणालीवरच मागील काही वर्षांपासून गदा आणली जात आहे. हंगामपूर्व लागवड रोखण्यासाठी कृषी विभाग राज्य शासन बियाणे विक्री वेळापत्रक जाहीर करीत आहे..HTBT Seeds Illegal Sale: एचटीबीटी कपाशी बियाणे विक्री विरोधात कारवाई करा.यावर्षी हे वेळापत्रकास मान्यता देण्यास राज्य शासनाने उशीर केला. त्यामुळे निविष्ठा विक्रेत्यांच्या संपामुळे आधीच निविष्ठा पुरवठा खोळंबलेला होता. त्यात बीटी बियाणे विक्री वेळापत्रक मान्यतेस उशीर झाल्याने संपूर्ण पुरवठा साखळीतच संभ्रमावस्था आहे. आता या वेळापत्रकानुसार किरकोळ विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना १५ मेपासून बियाणे उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लागवड एक जूनपासून करायची आहे..या निर्बंधामुळे अनधिकृत एचटीबीटी बियाणे उत्पादक, विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे. हंगामपूर्व लागवडीसाठी बीटी कापसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने बहुतांश शेतकरी काळ्याबाजारातून एचटीबीटी बियाणे घेऊन त्याची लागवड करीत आहेत. यामध्ये कापूस उत्पादकांची लूट वाढली आहे..बीटीच्या आगमनापूर्वी जमिनीच्या प्रतवारीनुसार वाणांची निवड होत होती. ठरावीक अंतरावर लागवडीची फुली पद्धत होती. आता कोणतेही वाणं कोणत्याही जमिनीत लावले जाते. लागवडीत पावली पद्धतीचा सर्वत्र अवलंब केला जात असून त्यात दोन ओळी, दोन झाडे यातील अंतर निश्चित नाही..बीटीच्या अधिक बियाण्याच्या वापर व्हावा म्हणून कंपन्यांनी ही पद्धत प्रचलित केली आहे. अन्नद्रव्ये व्यवस्थापनाबाबत कापूस उत्पादकांमध्ये मोठा संभ्रम आहे. बीटी कापूस व्यवस्थापनाबाबत कृषी विद्यापीठे, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडूनही ठोस असे मार्गदर्शन झाले नाही. त्यामुळे कापूस लागवड आणि व्यवस्थापनात उत्पादकांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. हा सर्व गोंधळ दूर कधी होणार, हा खरा प्रश्न आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.