Aravalli Conservation and Biodiversity Protection: या वर्षीच्या उन्हाळ्यातील असह्य अशा तापमानाच्या झळांचा अनुभव संपूर्ण देशवासीयांनी घेतला आहे. विकासाच्या नावाखाली होत असलेला पर्यावरणाचा नाश हे एकंदरीतच जागतिक तापमानवाढीस पूरक ठरत आहे. जागतिक तापमानवाढीने देशात नैसर्गिक आपत्ती वाढल्या असून, त्याचे गंभीर परिणाम शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता भोगत आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी देखील निसर्ग-पर्यावरणाचे लचके तोडले जात आहेत. विकासास विरोध करण्याचे कारण नाही. .परंतु विकासाच्या नावाखाली होत असलेली सर्वच कामे खरोखरच गरजेची आहेत का, यातील काही कामे पुढे विनाशकारी तर ठरणार नाहीत ना, याचा गांभीर्याने विचार मात्र व्हायला हवा. मागील सहा महिन्यांपासून अति प्राचीन अरवली पर्वतरांग चांगलीच चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेली अरवलीची नवी व्याख्या हा सर्वत्रच चिंतेचा विषय ठरलेला आहे..Environment Conservation: भोकणी गावाची जडली पर्यावरणाशी मैत्री.या नव्या व्याख्येनुसार अरवलीच्या ज्या टेकड्यांची उंची १०० मीटरपेक्षा कमी आहे, त्यांना संरक्षणातून वगळले जाणार आहे. यामुळे अरवली पर्वतरांगेचा सुमारे ८० ते ९० टक्के भाग हा खाणकामासाठी खुला होणार असल्याने जन आंदोलनाने त्यास प्रचंड विरोध केला. परिणामी अरवलीच्या नव्या व्याख्येचा फेरविचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका तज्ज्ञ समितीची स्थापना नुकतीच केली आहे..जगातील सर्वांत प्राचीन पर्वतांपैकी एक असलेल्या अरवली पर्वत रांगा गुजरातपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या आहेत. मात्र गेल्या काही दशकांतील मानवी हस्तक्षेप आणि अलीकडच्या काही वादग्रस्त धोरणांमुळे हा निसर्गदत्त ठेवा आज अस्तित्वाची लढाई लढत उभा असल्याची परिस्थिती आहे. केंद्र सरकारच्या गेल्या बारा वर्षांच्या काळात जवळपास पावणेदोन लाख हेक्टर जंगल क्षेत्र हे खाणी, रस्ते यासाठी देण्यात आले आहे..Environment Protection: झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले !.अरवली पर्वतरांगा ही एक नैसर्गिक भिंत आहे. जर या टेकड्या तोडल्या गेल्या, तर थरच्या वाळवंटातून येणारी वाळूची वादळे थेट दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील सुपीक जमिनींना वाळवंटात रूपांतरित करतील. अरवलीचे खडक सच्छिद्र आहेत, जे पावसाचे पाणी शोषून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवतात. दिल्ली-एनसीआर आणि राजस्थानमधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अरवलीचे अस्तित्व टिकवणे हा एकमेव वैज्ञानिक उपाय आहे..या पर्वतरांगा फोडल्यास येथील नैसर्गिक जलस्रोत नष्ट होतील. वैज्ञानिक अभ्यासानुसार, अरवली नष्ट झाल्यास उत्तर भारतातील हवेतील धूलिकणांचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढू शकते. त्यामुळे मुळातच अति प्रदूषित असलेल्या दिल्ली शहरात श्वास घेणे कठीण होणार आहे. एवढेच नव्हे तर हा पर्वत अनेक दुर्मीळ वन्यजीवांचे, शेकडो पक्ष्यांचे घर आहे..यात मानवी हस्तक्षेप वाढल्यास या वन्यजीवांचे अधिवास नष्ट होतील, ज्यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्षात वाढ होऊ शकते. ही सर्व परिस्थिती पाहता अरवली पर्वतरांगा या केवळ भौगोलिक रचना नसून त्या भारताच्या पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या ‘प्रहरी’ आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण, संवर्धन झालेच पाहिजे. या सर्व बाबींचा विचार अरवलीच्या नव्या व्याख्येचा फेरविचार करणाऱ्या तज्ज्ञ समितीने करायला हवा..एकीकडे पर्यावरणाचे लचके तोडण्याचे प्रयत्न होत आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे राजगड तालुक्यातील साखर येथील नीलेश किकले यांनी मात्र सर्वांसमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. त्यांंनी आपल्या सहा एकर शेतीपैकी पाच एकर क्षेत्र पशु,पक्षी वन्यजीवांसाठी राखीव ठेवले आहे. निसर्गासाठी राखून ठेवलेली जागा ही खर्च नसून भविष्यातील गुंतवणूक आहे, असे या शेतकऱ्याला वाटते. निसर्ग, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व एका शेतकऱ्याला कळाले आहे, केंद्र सरकारला ते कधी कळणार, हा खरा प्रश्न आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.