Ai Revolution India: शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी शेती किफायती ठरण्यासाठी त्यात भांडवली गुंतवणूक वाढवावी, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर व्हावा आणि मुक्त बाजारपेठेचा पुरस्कार सुमारे पाच दशकांपूर्वी केला होता. परंतु या तिन्ही पातळ्यांवर आजतागायत आनंदीआनंदच पाहायला मिळतो. शेतीत म्हणावी तेवढी गुंतवणूक झाली नाही. त्यामुळे शेतीसाठीच्या अत्याधुनिक सुविधा तर सोडाच, पायाभूत सेवासुविधांची देखील आजतागायत वानवा आहे. मुक्त बाजारपेठेचा पुरस्कार आपण केला परंतु या स्पर्धेत शेतकऱ्यांचे पाय बांधून त्यांना उतरविण्यात आले. .तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत देशांच्या खूप मागे आपण आहोत. एवढेच नव्हे तर तंत्रज्ञान वापराचे स्वातंत्र्य देशातील शेतकऱ्यांना आजही नाही. शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप संशोधन, तंत्रज्ञान विकसित होत नाही. जे काही संशोधन, तंत्रज्ञान विकास आहे, ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नाही..AI Weather Forecasting: ‘एआय’मुळे हवामान अंदाजांच्या अचूकतेत वाढ.ही सर्व पार्श्वभूमी येथे मांडण्याचे कारण म्हणजे मागचा आठवडा एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवरील साधक-बाधक चर्चांनी ढवळून निघाला. आठवड्याची सुरुवात दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ परिषदेने तर शेवट मुंबईतील ‘एआय फॉर ॲग्री’ परिषदेच्या सुरुवातीने झाला. या दोन्ही परिषदांमध्ये एआय तंत्राने मानव कल्याणपासून ते सर्वसमावेशक शेती विकासाबाबतचे अनेक दावे करण्यात आले. परंतु यातील मर्यादा, आव्हानांचा वस्तुनिष्ठ विचार न करता दोन्ही परिषदांना केवळ उत्सवी स्वरूप देण्यात केंद्र तसेच राज्य सरकार यशस्वी झाले, असे म्हणावे लागेल..दिल्ली येथील एआय परिषद हे उपलब्धीऐवजी नियोजन आणि नैतिकतेच्या अभावानेच अधिक गाजली तर मुंबई येथील परिषदेचे एवढ्या घाईगडबडीने आयोजनाचे कारणही काही लपून राहिलेले नाही. राज्याच्या मागील अर्थसंकल्पात एआयसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. परिषदेच्या आयोजनापूर्वी वर्षभर या निधीपैकी एक रुपया देखील खर्च करण्यात आला नव्हता..Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत.असे असताना परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मात्र महाराष्ट्राला एआय तंत्रज्ञानाची राजधानी बनविणार, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत एआय तंत्रज्ञान पोहोचविणार असे दावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. खरे तर बारामतीच्या ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ने जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या साह्याने एआय ऊसशेतीचा पथदर्शक प्रकल्प यशस्वी करून दाखविला आहे. एआय तंत्राने ऊस उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादन वाढ शक्य झाले आहे..उसाबरोबर इतर पिकांमध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान वापराचे प्रयोग सुरु आहेत. असे असताना या तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी सरकार पातळीवर काहीही काम होताना दिसत नाही. या विषयातील संशोधनाची तसेच जे संशोधन झाले त्यास पाठिंबा देण्याची कुठलीही व्यवस्था आपल्याकडे नाही. त्यासाठीची इकोसिस्टीम आपण आत्तापर्यंत तयार केली नाही. अशा वेळी कोणते तंत्रज्ञान सरकार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार आहे, हा खरा प्रश्न आहे..एआय तंत्रज्ञानाने शेती, उद्योग तसेच सेवा क्षेत्रात लवकरच क्रांती घडणार, हे निश्चित आहे. परंतु त्यासाठीची आपली तयारी किती आहे, यासाठीचे आपले धोरण काय आहे, त्याची अंमलबजावणी आपण कशी करणार आहोत, यावर या क्रांतीचे यश अवलंबून आहे. देशातील बहुतांश शेतकरी हा अल्पभूधारक तसेच जिरायती शेती कसणारा आहे..अशा शेतकऱ्यांना उपयुक्त एआय तंत्रज्ञान विकासावर आपला भर हवा. हे तंत्र वापरायला सोपे, तसेच ते स्वस्त असायला हवे. मुख्य म्हणजे ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे लागेल. उद्योग, सेवा क्षेत्राच्या बाबतीतही त्यांना नेमके काय हवे, याचा अभ्यास करून धोरण ठरवावे लागेल. असे झाले तरच या आधुनिक तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण झाले असे म्हणता येईल. हे न करता एआय तंत्रज्ञानाबाबतच्या सर्व गप्पा ह्या `खयाली पुलाव’ ठरतील, हे लक्षात घ्यायला हवे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.