Agri Market Trends: हळद उत्पादन आणि एकूणच पुरवठा कमी असतानाही हळदीच्या भावात अचानक तीन ते चार हजार रुपयांपर्यंत घट झाल्याने उत्पादकांमध्ये रोष आहे. तर दुसरीकडे बाजारात आवकेचा दबावही आहे. उत्पादन किती आहे, त्यापेक्षा हे उत्पादन शेतकरी किती दिवसात बाजारात विकतात याचा भावावर जास्त परिणाम होत असतो. हे लक्षात घेऊन हळद उत्पादकांनी सबुरीची भूमिका घेणे आवश्यक आहे. .मराठवाड्यात मागील आठवड्यात हळदीचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलने केली. बाजार समित्यांमध्ये मिळालेल्या भावापेक्षा एनसीडीईएक्सच्या २० एप्रिलच्या डिलिव्हरीचे स्पाॅटचे भाव जास्त होते. व्यापारी भाव पाडून खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. मार्च महिन्यात हळदीचे भाव प्रति क्विंटल १६ ते १७ हजार रुपयांच्या आसपास होते. एप्रिल महिन्यात भाव कमी होत १२ ते १३ हजार रुपयांवर पोहोचले. सध्या बाजारात हळदीला गुणवत्तेप्रमाणे ११ हजार ते १३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे सध्याचा भाव परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. हळदीचा उत्पादन खर्चच क्विंटलमागे १० हजारांच्या घरात गेल्याचे मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा रोष वाढलेला आहे..Turmeric Prices Drop: हळदीच्या भावात ३ हजारांची घसरण.अनेक बाजारांमधील भाव एप्रिल महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होते. वास्तविक यंदाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. त्यातच गेल्या वर्षीचा शिल्लक साठाही कमी आहे. त्यामुळे हळदीच्या भावात एवढी घसरण अपेक्षित नव्हती, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे बाजारात हळदीची आवक वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. नव्या मालाची काढणी सुरू झाल्यामुळे महत्त्वाच्या बाजारांमध्ये आवकेचा दबाव येत आहे. एकीकडे घटलेले उत्पादन आणि दुसरीकडे कमी झालेले भाव यामुळे हळदीचा तिढा निर्माण झाला. पण शेतकरी हळदीचा ताळेबंद मांडून भावासाठी लढत आहेत, ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र दरवर्षी हंगामात शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो तेव्हा येणारा आवकेचा दबाव आणि त्याआडून शेतकऱ्यांची आर्थिक नड लक्षात घेऊन केली जाणारी कोंडी लक्षात घ्यावी लागेल..शेतीमाल कुठलाही असो शेतकऱ्यांचा नव्या हंगामातील माल बाजारात येणार म्हटल्यावर भाव कमी होतातच, हा आजवरचा अनुभव आहे. हळदीच्या बाबतीतही तेच घडत आहे. हळदीचा वापर वर्षभर होत असला तरी शेतकरी दोन ते तीन महिन्यांतच माल विकतात; मग उत्पादन कितीही असो. या काळातच जवळपास ७० ते ८० टक्के माल बाजारात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन घटल्यामुळे संभाव्य तेजीचा लाभ मिळत नाही. अगदी मोजके शेतकरी त्या वेळी बाजारात असतात. बहुतांशी शेतकरी त्या हंगामातील मंदीत माल विकतात. यंदाही असेच घडताना दिसत आहे. चालू हंगामात हळदीची लागवड वाढल्याचे वेगवेगळे आकडे पुढे आले होते. लागवडीच्या हंगामात अगदी पाच टक्क्यांपासून ते २० टक्क्यांपर्यंत लागवड वाढल्याचे अंदाज वेगवेगळ्या भागातून येत होते. .देशपातळीवर जवळपास पाच टक्क्यांनी लागवड वाढल्याचा अंदाज मसाले बोर्डाने व्यक्त केला होता. तर केंद्र सरकारचा अंदाजही हेच सांगत होता. या लागवड वाढल्याच्या अंदाजावरून यंदा हळदीचे उत्पादनही विक्रमी होईल, असे भाकीत व्यापारी वर्गाकडून अगदी एप्रिल महिन्यापर्यंत केले जात होते. हळद जमिनीत असते त्यामुळे पिकाची काय परिस्थिती आहे, हे पीक काढणीवेळी स्पष्ट व्हायला लागते. तोपर्यंत व्यक्त केले जाणारे अंदाज लागवड क्षेत्र आणि सरासरी उत्पादकतेच्या आधारे दिले जातात. यंदाही तेच घडले. या अंदाजाच्या आधारे हंगामाच्या तोंडावरच बाजारात भाव कमी होत गेले. पण प्रत्यक्ष काढणी सुरू झाल्यानंतर उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच काही भागात गुणवत्तेचाही प्रश्न निर्माण झाला. अतिवृष्टी आणि कीड-रोगांमुळे उत्पादन कमी झाले आहे. तसेच बुरशीमुळे गुणवत्ता घटल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. अतिवृष्टी आणि कीड-रोगाचा फटका बसल्यामुळे वेगवेगळ्या भागात हळदीची उत्पादकता ३० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी आल्याचे मराठवाड्यातील शेतकरी सांगत आहेत..देशातील हळद उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यातही एकट्या मराठवाड्याच्या पट्ट्यात देशातील ४० टक्क्यांपर्यंत हळद उत्पादन होते. त्यामुळे मराठवाड्यातील हळद उत्पादनाकडे बाजाराचे लक्ष असते. हळदीची काढणी पूर्ण होत आहे तसे उत्पादनातील घट स्पष्ट होत आहे. त्यातच गेल्या हंगामातील शिल्लक साठाही यंदा कमी आहे. गेल्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला शिल्लक साठा २० लाख पोत्यांच्या दरम्यान होता. तर यंदा शिल्लक साठा १५ लाख पोत्यांच्या दरम्यान असल्याचे व्यापारी आणि उद्योगांचे म्हणणे आहे. म्हणजेच उत्पादन कमी आणि शिल्लक साठाही कमी असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे यंदा हळदीला चांगला भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे..Turmeric Price Issue: हळदीचे दर 'जैसे थे'; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ.पॅनिक सेलिंगचे काय? शेतकऱ्यांची चांगल्या भावाची मागणी रास्त असली, तरी बाजारातील ‘पॅनिक सेलिंग''चे म्हणजे घाबरून घाईघाईने विक्री करण्याचे काय, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. हळदीच्या उत्पादनातील घट, गेल्या वर्षीच्या शिल्लक साठ्याचे घटलेले प्रमाण यामुळे एकूण पुरवठा कमी आहे. शिवाय नव्या हंगामावर एल- निनोचे सावट आहे. या सर्व बाजू हळदीच्या दरवाढीला पूरक दिसत आहेत. पण सध्या बाजारात आवकेचा दबाव निर्माण झाला आहे. हिंगोली, वसमतसह जवळपास सर्वच बाजारांमधील आवक वाढलेली आहे. हिंगोलीत तर नव्या मालाची आवारातील आवक थांबविण्यात आली होती. ‘पॅनिक सेलिंग’ वाढून आवकेचा दबाव निर्माण झाल्यामुळे बाजारात नैसर्गिकरीत्या जे घडते तेच झाले. हळदीचा भाव कमी झाला. पुढे भलेही मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहून तेजीही येईल, पण सध्या तरी आवकेचा दबाव आहे. त्यामुळे उत्पादन किती कमी झाले यापेक्षा जे काही उत्पादन झाले ते किती दिवसांमध्ये शेतकरी बाजारात आणतात, याचा बाजारावर परिणाम होत असतो. याचा प्रत्यय सध्या बाजारात येत आहे. .बहुतांशी शेतकरी मे महिन्यापर्यंत जास्त हळद विकतात. जास्तीत जास्त जून महिन्यापर्यंत थांबतात. पण त्यानंतर वातावरणात आर्द्रता वाढू लागते आणि हळदीत डंकीची समस्या यायला सुरुवात होते. त्यामुळे जुलैच्या पुढे शेतकरी जास्त थांबत नाहीत. शेतकऱ्यांची ही अडचण उद्योगांनाही माहिती आहे. खरे तर हळद उत्पादकांची ही अडचण दूर करण्यासाठी काम होणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना पुरवठा कमी होऊन संभाव्य तेजीचा जास्त फायदा घेता येणे कठीण आहे. .तरीही शेतकरी ‘पॅनिक सेलिंग’ टाळून शक्य तेवढा माल मागे ठेवू शकतात. मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी हा पर्याय स्वीकारल्याचे लक्षात आले. अनेक शेतकरी बाजाराची पुढील चाल लक्षात घेऊन लगेच विक्री करण्याचे टाळत आहेत. मराठवाड्यातील अभ्यासू शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन ‘पॅनिक सेलिंग’ टाळण्यासाठी अन्य शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. या मोहिमेला यश आल्यास पुढील काही आठवड्यांनंतर आवकेचा दबाव नक्कीच कमी होण्यास मदत होईल. युद्धामुळे निर्यात कमी होत असल्याचीही सध्या बाजारात चर्चा आहे. मात्र यंदा उत्पादनच कमी असल्यामुळे निर्यात काही काळ कमी झाली तरी काळजी करण्याची गरज नाही, असे काही निर्यातदारांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी ‘पॅनिक सेलिंग’ टाळून गरजेप्रमाणे टप्प्याटप्प्याने हळद विक्री फायदेशीर ठरू शकते, असे अभ्यासकांचे मत आहे..साठवण व्यवस्था आवश्यकशेतकरी हळद जास्त दिवस घरात साठवून ठेवू शकत नाहीत. आधी सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण वाढले आणि वातावरणात आर्द्रता निर्माण झाल्यास घरात साठवून ठेवलेल्या हळदीत डंकीची समस्या तयार व्हायला सुरुवात होते. तरीही जूनपर्यंत हळद चांगली राहते, असे जाणकार शेतकरी आणि हळदीत काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सांगितले. हळद उत्पादकांची मानसिकता पाहता जूनपर्यंत हळद बाजारात बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. उत्पादनातील घट आणखी स्पष्ट झाल्यास दराला नक्कीच आधार मिळू शकतो आणि याचा फायदा शेतकऱ्यांनाही होऊ शकतो. .पण तोपर्यंत बाजारातील ‘पॅनिक सेलिंग’ टाळणे आवश्यक आहे. शेतकरी जास्त दिवस थांबायचे असल्यास गोदामांमध्ये (वेअरहाउस) हळद ठेवू शकतात. तिथे हळद ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना त्यावर कर्जही मिळते. म्हणजेच एक तर हळद खराब होण्याचा धोकाही कमी होतो आणि गरज भागविण्यासाठी पैशांची तजवीजही शक्य होते. पण वरकरणी हा सल्ला सहज सोपा वाटत असला तरी शेतकऱ्यांसाठी तेवढाच कठीण आहे. कारण हळद उत्पादनात आघाडीवर असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील पट्ट्यात गोदामे उपलब्ध नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. शासनाची गोदामे हमीभावाने खरेदी केलेल्या मालानेच भरलेली असतात. तर खासगी गोदामांमध्ये सुसूत्रता नाही. त्यांच्यावर बॅंका विश्वास ठेवायला तयार नाहीत. या गोदामांमध्ये हळद ठेवली तरी बॅंका ६० टक्क्यांच्या वर कर्ज द्यायला तयार होत नाहीत, असे काही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले..हळद उत्पादक पट्ट्यात गोदाम सुविधांचा विकास करणे गरजेचे आहे. बॅंकांनी वेअरहाउस पावतीवर सुलभ कर्जे देणे आवश्यक आहे. तेव्हाच कुठे हळद उत्पादक तेजीमंदीसाठी जास्त दिवस गोदामांमध्ये माल ठेवू शकतील. या व्यवस्थेला हळद उत्पादकांचा नक्कीच प्रतिसाद मिळेल..‘एल निनो’चा परिणामहळदीच्या बाजाराला भविष्यात आधार देणारा आणखी एक घटक म्हणजे नव्या हंगामावरील एल निनोचे सावट. यंदाच्या माॅन्सून हंगामात पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. याचा हळद लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच हळद हे जास्त कालावधीचे पीक असल्याने उत्पादकतेलाही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चालू हंगामातील हळदीवर पुढील काळात जास्त मदार असणार आहे. त्याचा आधार दराला मिळेल. विशेष म्हणजे हळदीचे भाव वाढले तरी हळदीचा वापर बंद होत नाही. .हळदीचा दैनंदिन वापर आधीच कमी असतो. त्यामुळे घरगुती वापर कमी होत नाही. प्रक्रिया उद्योगातील वापरावर काहीसा परिणाम होतो. पण भाव वाढल्यानंतर हळदीत भेसळ वाढते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच हळद आयातीवर देखील मर्यादा आहेत. जगातील जवळपास ८० टक्के हळद उत्पादन भारतात होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्धता कमी असते..एल निनोचा नवीन हंगामातील हळद पिकावर कसा आणि किती परिणाम होतो, यावर बाजारातील त्या त्या वेळची गणिते अवलंबून असतील. हळद पिकाला पाणी जास्त लागते. या पिकाला पाण्याचा जास्त ताण सहन होत नाही. त्यामुळे पाणीटंचाई असेल, तर हळदीची लागवड वाढली तरीही उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. थोडक्यात काय, तर यंदाचे उत्पादन घटलेले आहेच आणि पुढील हंगामावर कमी पावसाचे सावट आहे. या बाजू दरवाढीसाठी पोषक आहेत. त्यामुळे हळद उत्पादकांनी सबुरीची भूमिका घेणे आवश्यक आहे. बाजारात चढ- उतार होत असतात तो बाजाराचा गुणधर्म आहे. हळदीचे बाजारभाव सध्याच्या पातळीवरून जास्त कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘पॅनिक सेलिंग’ न करता गरजेप्रमाणे बाजाराचा आढावा घेऊन हळद विक्री करावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.(लेखक ॲग्रोवन डिजिटलचे कंटेन्ट लीड आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.