Grain Market Updates: मागील वर्षभर दबावात असलेल्या मक्याला पुढील काळात पुन्हा एकदा इथेनाॅल आणि ‘एल निनो’मुळे आधार मिळण्याची शक्यता आहे. मक्याच्या बाजारात मागील काही आठवड्यांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. यंदा मका उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तर इथेनाॅलसाठी मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मक्याला मागणी वाढून मका हमीभावाच्या पुढे स्थिरावण्याची शक्यता आहे..मक्याला मागील पाच वर्षांत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याला कारण ठरले इथेनाॅल धोरण. पोल्ट्री आणि स्टार्च उद्योग मक्याचे पारंपरिक ग्राहक होते. पण त्यात भर पडली ती तिसऱ्या आणि महत्वाच्या इथेनाॅल उद्योगाची. सरकारने धान्यापासून इथेनाॅल निर्मितीला परवानगी दिली आणि मक्याला मागणी वाढली. मक्याने कापूस आणि सोयाबीनची जागा घेतली आहे..मागील पाच वर्षात मक्याची लागवड ४५ टक्क्याने वाढली तर उत्पादन तब्बल ७४ टक्क्यांनी वाढले आहे. उत्पादकताही १५ टक्क्यांनी वाढली आहे. २०२०-२१ मध्ये मक्याची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात ९९ लाख हेक्टरवर झाली होती. यातून ३१६ लाख टन एवढे उत्पादन मिळाले होते. तर २०२५-२६ मध्ये तिन्ही हंगामांत लागवड १४४ लाख हेक्टर झाली आणि उत्पादन विक्रमी ५५१ लाख टनांवर पोहोचले. मागील दोन वर्षांत सोयाबीन आणि कापसाची लागवड कमी झाली आणि मक्याची लागवड वाढली. २०२४-२५ मध्ये मक्याचे क्षेत्र १२० लाख हेक्टर आणि २०२३-२४ मध्ये ११२ लाख हेक्टर होते..विशेष म्हणजे लागवडीत झालेल्या वाढीपेक्षा उत्पादनातील वाढ जास्त आहे. शेतकऱ्यांनी मका पिकासाठी बियाण्यापासून ते काढणीपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे दिसून येते. यामागे प्रेरणा होती चांगल्या भावाची. हा भाव मिळाला इथेनाॅलमुळे. केंद्र सरकारने इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी २०१८ मध्ये जैवइंधन धोरण आणले. या धोरणात इथेनाॅल उद्योगाच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला. आयात होणाऱ्या इंधनावरचा खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांना उत्पन्नाचा पर्याय देणे, ही मुख्य उद्दिष्टे या धोरणामागे असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते..Maize Cultivation: खानदेशात मका क्षेत्र पोहोचले एक लाख २० हजार हेक्टरवर.इथेनाॅल निर्मितीसाठी उसाचा रस, मोलॅसिस, तुकडा तांदूळ, मका आणि खराब धान्याचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे इथेनाॅल प्लांटसाठी साखर कारखाने आणि धान्यापासून इथेनाॅल निर्मिती करणाऱ्या उद्योगांना क्षमता वाढीसाठी सुलभ कर्जे उपलब्ध करून दिली. इथेनाॅलचे पेट्रोलमध्ये मिश्रण वाढविण्यासाठी वेळोवेळी धोरणांत बदलही केला. विशेष म्हणजे मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनाॅलच्या दरात सर्वाधिक वाढ केली. यामुळे देशातील मका पिकाचे चित्र बदलले. .२०२३ मध्ये देशात मका १४०० रुपये क्विंटलच्या जवळपास विकला जात होता. पण सध्या मक्याचा भाव २३०० रुपयांच्या दरम्यान आहे. मागील तीन वर्षे मक्याला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे मक्याचे उत्पादन वाढून इथेनाॅल निर्मितीसाठी कच्चा मालही उपलब्ध झाला. यामुळे देशातील इथेनाॅल निर्मिती वाढून केंद्राचे उद्दिष्टही साध्य झाले. देशाने मे २०२५ मध्ये पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनाॅल मिश्रणाचे अर्थात ई- २० चे उद्दिष्ट गाठले. इथेनाॅल धोरणाची गती पाहता २०२६ मध्ये ई-२३ चेही उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता आहे..वर्षनिहाय इथेनाॅल निर्मितीचे प्रमाणवर्ष मिश्रण (टक्के)२०१७ १.८२०१८ ३.७२०१९ ४.४२०२० ५.२२०२१ ८२०२२ ८.८२०२३ ११.४२०२४ १३.२२०२५ २०२०२६ २३.४(स्रोत : यूएसडीए फॉरेन अॅग्रिकल्चर सर्व्हिस, दिल्ली).भारतात २०२१ मध्ये ६०० कोटी लिटर इथेनाॅल निर्मितीची क्षमता होती. सध्या २ हजार २०० कोटी लिटर इथेनाॅल निर्मितीची क्षमता निर्माण झाली आहे. यापैकी केवळ ५२ टक्केच क्षमता वापरली जात आहे. त्यामुळे उद्योगांकडून जास्त इथेनाॅल मिश्रणाची मागणी केली जात आहे. तसेच देशात इथेनाॅलचा वापर वाढण्यासाठी रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय वाहून कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. यानुसार ई ८५ म्हणजेच पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनाॅल मिश्रणाचे आणि ई १००, अर्थात पूर्ण इथेनाॅल वापरचा प्रस्ताव आहे. देशात २०२६ मध्ये १२८० कोटी लिटर इथेनाॅल वापर होण्याची शक्यता आहे..यापैकी ११३० कोटी लिटर इंधनासाठी होण्याचा अंदाज आहे. देशात यंदा १२४० कोटी लिटर इथेनाॅल निर्मिती होण्याची शक्यता असल्याचे यूएसडीएच्या दिल्ली कार्यालयाने म्हटले आहे. यात ७३ टक्के इथेनाॅल धान्यापासून निर्मित होण्याची शक्यता आहे. मक्यापासून ४६ टक्के आणि तांदळापासून २२ टक्के इथेनॉल निर्मिती होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उसापासून २७ टक्के इथेनाॅल मिळण्याची शक्यता आहे. सरकारने मक्यापासून निर्मित इथेनाॅलचा भाव २०२५ मध्ये वाढवून ७१.८६ रुपये केला होता. या धोरणामुळे इथेनाॅलसाठी मक्याचा वापर वाढण्यास मदत झाली आहे..Maize Farming: पेरण्या लांबूनही शेतकऱ्यांची मक्यालाच पसंती.बाजारातील मरगळ गेलीमागील खरीपासून देशात मक्याचा भाव हमीभावापेक्ष कमी झाला होता. देशातील मक्याचे वाढलेले उत्पादन आणि सरकारने इथेनाॅलसाठी स्वस्तात दिलेला तांदूळ ही दोन कारणे होती. उसाचेही उत्पादन चांगले होते. यामुळे इथेनाॅल निर्मितीसाठी मका, उसाचा रस, मोलॅसिस, तांदूळ आणि खराब धान्य उपलब्ध होते. .परिणामी मक्याला वाढलेल्या भावात उठाव कमी होऊन भाव दबावात आले होते. खरिपात मका बाजारात आल्यानंतर शेतकऱ्यांना अगदी १५०० रुपयांपासून मका विकावा लागला होता. उन्हाळी मका बाजारात येईपर्यंत भाव दबावात राहिले. पण जसजसे यंदा एल निनोचे सावट स्पष्ट होऊ लागले आणि मक्याची लागवड कमी होण्याचे अंदाज आले तसे मक्याच्या भावात वाढ होत गेली. सोयापेंडच्या भावात वाढ झाल्याने पोल्ट्री उद्योगाची मक्याला मागणी वाढली. याचा आधार मक्याच्या भावाला मिळत गेला..मक्याचे भाव कमी असल्याने मक्याची निर्यातही यंदा वाढली आहे. यंदा पहिल्या पाच महिन्यांमध्येच ११ लाख टनांच्या आसपास निर्यात झाली होती. मागील हंगामात याच काळात केवळ सव्वादोन लाख टनांच्या आसपास निर्यात झाली होती. यंदा २४ लाख टनांच्या आसपास निर्यात होण्याचा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला आहे. या सर्व कारणांनी मक्याचा बाजार सुधारला आहे. सध्या मक्याला प्रति क्विंटल सरासरी २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान बाजारात भाव मिळत आहे. .देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे खरिपातील मक्याची लागवड अनेक भागात कमी होत आहे. मक्याला जास्त पाणी लागते. परिणामी शेतकरी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाकडे वळत आहेत. आतापर्यंत खरिपातील लागवड पाच टक्क्यांनी पिछाडीवर आहे. तसेच उत्पादकताही कमी येण्याचा अंदाज आहे. पुढे रब्बी आणि उन्हाळी हंगामातही मक्याची लागवड कमी होण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांनी यंदा खरिप, रब्बी आणि उन्हाळी या सर्व हंगामांमध्ये मक्याचे उत्पादन कमी राहण्याची दाट शक्यता आहे..मक्याला उठाव मिळणारमक्याला पुढील काळात चांगली मागणी राहण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षभर पोल्ट्री उद्योगाला सोयापेंड स्वस्तात मिळत होते. याचा दबाव मक्याच्या भावावर आला होता. तसेच इथेनाॅलसाठी सरकारने स्वस्तात तांदूळ दिला. उसाचाही पर्याय उपलब्ध होता. यामुळे इथेनाॅलसाठी मक्याची मागणी कमी झाली होती. पण यंदा कमी पावसामुळे इथेनाॅल उत्पादनाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे उसाचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळे साखर उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. .म्हणजेच पुढील काळात इथेनाॅलसाठी उसाचा पर्याय तुलनेने कमी उपलब्ध असेल. तसेच भात पिकावर अनेक भागांत कमी पावसाचा परिणाम होत आहे. भात उत्पादनासाठी खरीप हंगाम महत्त्वाचा आहे. पण खरिपात पाऊस पुरेसा नाही. तसेच रब्बी आणि उन्हाळी हंगामातही उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशातील तांदळाचे उत्पादन घटल्यास इथेनाॅलसाठी मक्याला मागणी येईल. याचा आधार मक्याच्या भावाला मिळण्याची दाट शक्यता आहे..देशात मक्याचा भाव वाढल्यानंतर निर्यात कमी होऊन आयात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण देशात जीएम मका आयातीला परवानगी नाही. तसेच इथेनाॅलची आयातही केवळ औद्योगिक वापरासाठी होते. इंधनामध्ये मिश्रणासाठी इथेनाॅल आयातीवर १५० टक्के शुल्क आहे; त्यामुळे आयात शक्य होत नाही. पुढील काळात सरकारच्या या धोरणाकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. अमेरिका भारताने आपल्याकडून इथेनाॅल घ्यावे, यासाठी दबाव आणत आहे. आतापर्यंत सरकारने जीएम मका आयातीला आणि इंधनासाठी इथेनाॅल आयातीवरील शुल्क कमी करण्याला विरोध केलेला आहे. सरकारचे हे धोरण कायम राहिल्यास मक्याला चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे.(लेखक ॲग्रोवन डिजिटलचे कंटेन्ट लीड आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.