Women Farmers: कर्जाच्या विळख्यात अडकूनही शेतकरी महिला पुन्हा उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी ‘कमी जोखीम, कमी उत्पादन, पण अधिक स्थैर्य’ देणाऱ्या पिकांची लागवड केली. अशी निवड त्यांनी भीतिपोटी किंवा पैसे नाहीत म्हणून केली नाही, तर ती विचारपूर्वक केली. भरघोस पिकाच्या आशेने पुनःपुन्हा कर्ज काढून अनिश्चिततेच्या खाईत जाण्याचे नाकारत त्यांनी व्यावहारिक विचार केला. हळूहळू कर्ज फेडण्यास त्यांनी प्राधान्य दिले आणि ते करूनही दाखविले. संकटकाळात तगून राहण्याचा चिवटपणा, आर्थिक आणि व्यावहारिक शहाणपणा यांतून दिसतो. .कित्येक दशकांपूर्वीच्या ग्रामीण व्यवस्थेचा विचार केला तर शेती हा मुख्यतः एक ‘कौटुंबिक’ उद्योग म्हणून केला जात होता असे आपल्या लक्षात येते. शेती, पशुपालन आणि त्याला शेती संलग्न व्यवसायांची जोड देत शेतकरी कुटुंब उदरनिर्वाह करत असे आणि या कामांमध्ये घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असे. वय आणि कुवतीप्रमाणे कामाची विभागणी केलेली होती. मशागत ते पेरणीपासून काढणीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेशी घरातील प्रत्येक व्यक्ती जोडलेली होती. शेती हा एकत्रित उद्योग होता, त्यात सर्व कुटुंबाच्या श्रमाची गुंतवणूक होती. निर्णयप्रक्रियाही सर्वांच्या चर्चेतून घडणार अशी पद्धत होती. शेतीची सगळी सूत्रे पुरुषांच्या हाती एकवटलेली नव्हती. त्यामुळे ‘शेतकरी शेती करतो’ आणि ‘महिला मदत करतात’ असा भेदाभेद नव्हता..Rural Women Empowerment : गावकुसात गायब असलेला महिला दिन.पुरुषकेंद्री व्यवस्थेचा परिणामपुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे! शेती आणि महिलांचे नाते समाजासमोर आणण्यासाठी आज आपल्याला ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ साजरे करावे लागत आहे. इतके कसे महिला शेतकऱ्यांचे योगदान विस्मरणात गेले, आज शेतकरी महिला म्हणून वेगळे वर्ष साजरे का करावे लागत आहे आणि ते कसे करायला हवे, या प्रश्नांचा विचार या वर्षाच्या निमित्ताने व्हायला हवा..शेती आणि अर्थव्यवस्था यांचे जसजसे औपचारिकीकरण आणि केंद्रीकरण होऊ लागले, तसतशी परिस्थिती बदलत गेली. प्रबळ पुरुषसत्ताक विचारसरणीमुळे मालकी हक्क आपसूकच घरातील पुरुषाच्या नावावर गेले. जमिनीची नोंदणी, बँक खाती पुरुषांच्याच नावे झाली. आपल्या समाजात महिलांपेक्षा पुरुषांना घराबाहेरच्या जगात वावरण्याची, औपचारिक शिक्षणाची अधिक संधी मिळते, त्यामुळे व्यवहार त्यांच्या हाती गेले. सरकारी योजना कागदावर उतरविल्या त्यात जमीन मालकाला, म्हणजे पुन्हा पुरुषालाच प्राधान्य. पुरुषांच्या बरोबरीने कसणाऱ्या महिलांची कागदोपत्री ‘शेतकरी’ म्हणून ओळख पुसली गेली. तरीही महिला शेती करतच राहिल्या. आजही शेती आणि शेतीसंलग्न व्यवसायासाठी लागणारी निर्णय क्षमता, बाजारपेठेची समज, शेतीमाल दीर्घकाळापर्यंत टिकविण्यासाठी करावी लागणाऱ्या प्रक्रिया, बियाण्यांचे जतन अशा विविध स्तरांवर शेतकरी महिलाच योगदान करत आहेतच..कित्येक महिला आपल्या शेतातील भाजीपाला गावाजवळच्या बाजारात किंवा जवळच्या मोठ्या रस्त्यावर विकतात. तसेच मासेमारीसारख्या व्यवसायात समुद्रातून मासे पकडून आणण्याचे काम पुरुष करतात आणि महिला सक्षमपणे बाजारपेठ सांभाळतात. ही महिलांना सामावून घेणारी व्यवस्था जेव्हा बदलते, तेव्हा महिला शेतकरी अदृश्य होऊ लागतात. मोठी मंडई, घाऊक बाजारपेठ, त्यासाठी टेम्पोने वाहतूक आणि भल्या पहाटेपासून सुरू होणारे व्यवहार, अशी व्यवस्था अधिक पुरुष-केंद्री म्हणजेच पुरुषांसाठी अधिक सोईस्कर ठरते. प्रक्रियेच्या या प्रवाहात महिला मुख्य आर्थिक व्यवहारांमधून हळूहळू बाहेर फेकल्या गेल्या..व्यावहारिक शहाणपणाशेती आणि सलग्न व्यवसायात कायमच अस्मानी आणि सुलतानी समस्यांची जोखीम असते. या अस्थिरतेमुळे निर्णय घेण्याची क्षमताही खूप महत्त्वाची ठरते. मागच्या अनुभवाच्या आधारावर पुढची चाहूल समजून घेत निर्णय घ्यावे लागतात. ज्या शेतकऱ्यांनी शेतीतील संकटांचा सामना करताना हतबल होऊन आत्महत्या केली, तेव्हा महिलांनी कुटुंब आणि शेतीला कसे सावरले याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. दीप्ती राऊत या पत्रकार महिलेने महाराष्ट्रभर फिरून अशा महिला शेतकऱ्यांना भेटून ‘कोरडी शेतं... ओले डोळे’ हे पुस्तक लिहिले आहे, त्यात अशा सक्षम स्त्रिया आपल्याला भेटतात..कर्जाच्या विळख्यात अडकूनही या महिला पुन्हा उभ्या राहिल्या. त्यांनी ‘कमी जोखीम, कमी उत्पादन, पण अधिक स्थैर्य’ देणारी पिके घेतली. अशी निवड त्यांनी भीतिपोटी किंवा पैसे नाहीत म्हणून केली नाही, तर ती विचारपूर्वक केली. भरघोस पिकाच्या आशेने पुनःपुन्हा कर्ज काढून अनिश्चिततेच्या खाईत जाण्याचे नाकारत त्यांनी व्यावहारिक विचार केला. लगेच भरघोस नफा मिळाला नाही तरी चालेल, पण कुटुंबाला दोन वेळचे अन्न मिळेल, मुलामुलींची शाळा सुरू राहील, हळूहळू कर्ज फेडण्यास त्यांनी प्राधान्य दिले आणि ते करूनही दाखविले. संकटकाळात तगून राहण्याचा चिवटपणा, आर्थिक आणि व्यावहारिक शहाणपणा यांतून दिसतो..विविध धान्ये, भाजीपाला, फळे, मासे टिकविण्याचे कसब महिलांमध्ये आहे. हा माल नेमका कधी, किती वेळ आणि कशा प्रकारचे वाळवायचा हे त्यांना उमजले आहे. त्यामुळे संकट किंवा अभावाच्या काळात खाण्यासाठी अन्न मिळते. अन्नसुरक्षेची ही महत्त्वपूर्ण पद्धत आहे. मालातील ओलावा काढण्यासाठी, सुकविण्यासाठी आता सोलर ड्रायर आहेत, ते तयार करण्याच्या संशोधनात कोणी महिलांना सल्लागार घेतल्याचे ऐकिवात नाही! कृषी क्षेत्रात आधुनिकता आली, पण ती पुरुष केंद्रीतच राहिली. ट्रॅक्टर, पेरणी यंत्रे आणि हार्वेस्टरमुळे फायदा आहेच, पण निंदणीसारखी, महिलांची मानली जाणारी शारीरिक कष्टाची कामे कमी करणारी यंत्रे बाजारात फारशी आढळत नाहीत. .Women Entrepreneurship: पापड, कुरडयांचा उद्योग-व्यवसाय तेजीत.सतत वाकून काम केल्याने येणारी कंबरेची दुखणी, पाय आणि हातांचे आजार या महिलांच्या समस्यांकडे व्यवस्थेने सोईस्कररीत्या डोळेझाक केली आहे. जागतिक महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने महिलांसाठी ‘वेगळी शेती शाळा’ किंवा केवळ महिलांसाठी ‘वेगळी योजना’ काढण्याची गरज नाही. त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे, महिला या शेतकरी आहेतच हे मान्य करणे. सात बाऱ्यावर त्यांचे नाव असेल, पीक कर्ज आणि बाजारातील विक्रीची पावतीही दोघांच्या नावावर असेल तर त्यासाठीचे निर्णयही दोघांचे असतील. .कार्यक्रमाची अंमलबजावणी महिलांना सामावून घेणारी पाहिजे. जसे, शेती शाळेचे आयोजन सकाळी आठपासून नको, तर महिलांना सवडीनुसार दुपारी तीन किंवा संध्याकाळी सहाला करायला हवे. शेतकऱ्यांसाठीच्या योजना नवरा-बायको दोघांच्या नावावर असल्या पाहिजेत. शेतीमध्ये महिला जे जे करत आल्या आहेत आणि करताहेत ते स्वीकारूया, त्यांच्या योगदानाचा योग्य सन्मान करू, त्यांना मुख्य प्रक्रियेत सामावून घेऊयात. अशी ‘स्वीकार, सन्मान आणि समावेश’ ही त्रिसूत्री अंगीकारण्याची गरज आहे. तेव्हा महिला शेतकरी वर्षाचे उद्दिष्ट साध्य झाले असेल..जैवविविधतेचे संवर्धनशेतीमधील महिलांचे सर्वांत मोठे आणि दुर्लक्षित योगदान म्हणजे त्यांनी जपलेली जैवविविधता. आज जी काही भरडधान्ये, विविध प्रकारचा तांदूळ, डाळी, तेलबिया, भाज्या याची गावरान बियाणे टिकून आहेत, ती महिलांमुळे. दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात जंगलातून काय मिळवायचे, कोणती भाजी खायची आणि काय साठवून ठेवायचे, याचे नेमके ज्ञान त्यांच्याकडे आहे. बियाणे टिकवून ठेवणाऱ्या आणि निसर्गाचे संतुलन जाणणाऱ्या या महिला ‘जनुकांच्या रक्षणकर्त्या’ आहेत. त्या कदाचित आधुनिक कृषी विज्ञानाच्या तांत्रिक भाषेत बोलत नसतील, पण त्यांच्याकडे असलेले पारंपरिक ज्ञान शेतीच्या शाश्वत भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. हवामान बदलाच्या संकटाला भिडण्यासाठी या विविधतेची समज असणे हा मोठा आधार आहे, त्यातूनच उपाय सापडण्याची शक्यता आहे..गावात मिळणारा रोजगार अधिक सुरक्षितप्रगती अभियान संस्थेतर्फे आम्ही अल्पभूधारक, कोरडवाहू शेती करणाऱ्या कुटुंबांसोबत काम करतो. शेतीसाठी पावसावर विसंबून असलेल्या या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसते, इतर सुविधा व संसाधनांचाही अभाव असतो. अशा शेतकरी समुदायासोबतच्या काम करताना विविध निरीक्षणे नोंदविता आली. पावसाळ्यातील शेती कामे झाल्यानंतर रोजगार हमीच्या कामांची वाट पाहायची नाही तर सक्तीचे स्थलांतर करायचे, अशा परिस्थितीत जगणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या तीस गावातील सहाशे महिलांचे आम्ही सर्व्हेक्षण केले..जेव्हा रोजगाराचा प्रश्न येतो, तेव्हा गावातल्या गावात मिळणारा रोजगार महिलांना अधिक जवळचा, सुरक्षित आणि सन्मानाचा वाटतो, असे यातून दिसले. स्थलांतरामुळे होणारी दैना, अपमान, असुरक्षितता आणि नवऱ्याच्या हातात दिली जाणारी मजुरी असे त्यांना नको आहे. रोजगार हमीत गावात रोजगार मिळतो, मजुरीचे पैसे थेट महिलेच्या हातात किंवा खात्यात जमा होतात आणि समान मजुरी मिळते. .यामुळे कुटुंबाला स्थैर्य मिळते, असे महिलांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, बाहेर जाऊन जास्त मजुरी मिळते असे म्हणणाऱ्या पुरुषांना त्यांनी गावातल्या रोजगार हमीच्या कामातच कसा फायदा आहे, हे नेमका हिशेब करून दाखवले. यातून तातडीचा चार जास्त पैशांपेक्षा अधिक स्थिर, शाश्वत काय आहे हे समजण्याचे त्यांचे शहाणपण आणि दूरवरचा विचार करण्याची क्षमता दिसून येते.pragati.abhiyan@gmail.com(लेखिका नाशिक येथील प्रगती अभियान संस्थेच्या संचालक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.