बालाजी मदन इंगळेSupporting Women Farmers: निसर्गाच्या कोपाने मराठवाड्यातील बाया कोलमडून पडतील इतक्या त्या मिळमिळीत नाहीत; पण घरातल्या आपल्याच माणसांच्या असहकार्यामुळे त्या हतबल होतात. पण मराठवाड्यातील शेतकरी बाई रानावर पडलेल्या पाचोळ्यासारखी हलकी झुळूक आल्यावर उडून जाणारी नाही, तर दाही दिशांतून संकटे आली तरी तुफानातल्या दिव्याप्रमाणे आपलं अस्तित्व टिकविणारी आहे..मराठवाड्यातील होरपळून टाकणाऱ्या उन्हात तळून इथल्या शेतकरी बायांची नुसती त्वचाच राठ नाही तर मनही ताठ आहेत. इथल्या कडाक्याच्या थंडीत गारठून इथल्या बायांचं अंगच फक्त खडबडीत नाही, तर आख्खं जगणंच खडबडीत आहे. ओढ दिलेल्या पावसाने इथली जमीनच भेगाळलेली नाही, तर इथल्या बायांच्या स्वप्नांनाच भेगा पडल्या आहेत. इथल्या अवकाळीच्या तडाख्यात नुसते पीक, जनावरं, झाडेझुडपेच सडकून मार खातात असं नाही तर या अचानक आलेल्या तडाख्याने इथल्या बायांचे मनसुबे दिवसाढवळ्या उद्ध्वस्त होतात. .Women Farmers: शेतीचा अदृश्य कणा....लहरी पावसाचा सामना फक्त पिकांनाच करावा लागतो असे नाही तर पावसाच्या लहरीपणात मराठवाड्यातील शेतकरी बाया अक्षरशः उद्ध्वस्ततेच्या सीमेवर जाऊन येतात. निसर्गाच्या कोपाने मराठवाड्यातील बाया कोलमडून पडतील इतक्या त्या मिळमिळीत नाहीत; पण घरातल्या आपल्याच माणसांच्या असहकार्यामुळे त्या हतबल होतात. पण मराठवाड्यातील शेतकरी बाई रानावर पडलेल्या पाचोळ्यासारखी हलकी झुळूक आल्यावर उडून जाणारी नाही तर दाही दिशांतून संकटे आली तरी तुफानातल्या दिव्याप्रमाणे आपलं अस्तित्व टिकवणारी आहे..मराठवाड्यातील शेतकरी स्त्री स्वाभिमानी आहे. आपला संसार ती गांभीर्याने घेते. म्हणून बहुतांश घरातील आणि शेतातील महत्त्वाचे निर्णय शेतकरी स्त्रियाच घेत असतात. या स्त्रियांकडे कमालीची चिकाटी आहे. आपला संसार आपल्याला टिकवून ठेवायचा आहे आणि पुढे न्यायचा आहे, लेकरा-बाळांचे भविष्य घडवायचे आहे याची काळजी या शेतकरी स्त्रीला असते. म्हणून ती ‘रिस्क’ घेत असते. जशी ती निर्णय घेते, तशी कामालाही मागे हटत नाही. कामाला मागे हटत नाही, म्हणूनच ती धाडसी निर्णय घेऊ शकते. बऱ्याचशा पुरुषांना मग आपल्या कारभारणीचे निर्णय आणि म्हणणं काळानुसार पटत जातं. म्हणून ते दोघांच्या विचाराने वागतात..शेतकरी स्त्री खंबीरपणे उभी...कायम दुष्काळी आणि टंचाईग्रस्त असलेल्या मराठवाड्यातील भूभाग भरघोस पीक काढावं असा नाही. तरीही अस्मानी आणि सुलतानी संकटांशी सामना करत इथला शेतकरी खंबीरपणे उभा आहे. पण त्याच्या मागे इथली शेतकरी स्त्री खंबीरपणे उभी आहे. मराठवाड्यातल्या प्रत्येक गावात एखादी देवी किंवा लक्ष्मी असते. मोठ्या भक्तिभावाने सर्व जण या लक्षुमीची आराधना करत असतात. प्रत्येक शेतकरी घरातील स्त्री शेत, घर दोन्ही सांभाळते. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी दोन हात करायला नेहमीच सज्ज असते. म्हणून प्रत्येक गावात जशी एखादी लक्षुमी असते, तशी प्रत्येक शेतकरी घरात इथे एक लक्षुमी असते. आणि या लक्षुमीमुळेच घराचं घरपण टिकून आहे. घरातील पुरुष मंडळी वेगवेगळ्या कारणांनी शेतीतील कामे टाळत असतील तर ही लक्षुमी पुढे होते. आणि सगळा कारभार हातात घेऊन संसाराचा गाडा हिमतीने ओढत राहते. नवऱ्याची आणि लेकाची साथ या लक्षुमीला मिळत नाही तेव्हा अशी परिस्थिती होते....आहेच कुठे गाव गावातउगंच उभी आहेत चार झाडांच्या संगतीनं घरंशेताच्या असंख्य तुकड्यावरला पाचोळा उडवतइकडून तिकडे वाहत आहे कोरडं वारं,पिऊन नशेत बापाचा धिंगाना घरी... भर दुपारी,बंधाऱ्याच्या कडेला आसू ढाळत तिफण उभी,भुकेने व्याकुळलेले दावणीला जनावरंपाण्यासाठी विहिरीकडे घेतात धाव.शिकल्या सवरलेल्या ल्योकाचाझाडाखाली मांडलेला पत्त्याचा डाव,धूर चुलीतला आईच्या डोळ्यातडोळ्यातले आसू फाटलेल्या पदरात,गायीला ओढ आता आईच्याच पायांची,मातीला माया आता आईच्याच हातांचीमातीपासून गडी असे कसे लांब चाललेघरातल्या लक्षुमीने किती म्हणून सावरावे...?(या परावलंबी दिवसात... मधून).संकटाला धैर्याने सामोरी...मराठवाड्यातील आजची शेतकरी महिला उच्चशिक्षित नाही. पण कामापुरतं शिकलेली आहे. ती पुस्तकी ज्ञानामध्ये मागे असेल, पण व्यावहारिक ज्ञानामध्ये पुढे आहे. आपल्या कोरडवाहू शेतीवर संसाराचा गाडा हाकताना अनंत अडचणींचा ती सामना करते. पण मागे हटत नाही. समोर येईल ती परिस्थिती ती स्वीकारते. वातावरणातील सगळे आघात सहन करत झाड जसे उभे असते, तशी ती उभी असते. .घरातल्या पुरुषांची व्यसने असोत, भावकीकडून होणारा त्रास असेल, मुलीचं लग्न असेल, मुलाचं शिक्षण असेल किंवा प्रतिकूल वातावरणाने बिघडणारे शेतीचे वेळापत्रक असेल कोणत्याही संकटाला ती धैर्याने सामोरे जाते. मराठवाड्यातील नैसर्गिक वातावरणाने जसे इथल्या मातीला कडक आणि कणखर बनवले आहे. तसा त्या मातीतील कणखरपणा मराठवाड्यातल्या शेतकरी स्त्रीमध्ये देखील आला आहे. जिद्द आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी हे मराठवाड्यातील शेतकरी स्त्रीचे वैशिष्ट्य आहे. परिस्थिती कवेत घेण्याची तिची ताकद विलक्षण आहे..Women Farmers Empowerment: गडचिरोलीत महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण.मराठवाड्यातील शेतकरी पुरुषांकडे पाहिले तर परिस्थितीला शरण जाण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये अधिक असल्याचे दिसून येते. आणि या उलट मराठवाड्यातील शेतकरी स्त्री मात्र परिस्थितीसमोर खंबीरपणे उभी राहते..अशा तिच्या प्रवृत्तीमुळे मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी महिला शेतीतील आणि घरातील निर्णयांमध्ये पुढे असते. आणि नकळतपणे शेतकरी पुरुषांनीही आता हे स्वीकारलेले आहे. त्यामुळे शेतीची कोणती कामे कोणत्या वेळी करावी हे ठरवत असताना पुरुष जरा पुढे-मागे करतो..पण शेतकरी स्त्री मात्र ठरल्यावेळी ठरलेली कामे करते. कारण कामाचे सगळे आव्हान ती घेते. म्हणून शेतीचे निर्णय घेण्यामध्ये ती पुढे असते. शेतीचे अर्थकारण आणि घराचे घरपण या दोन्हीमध्ये मराठवाड्यातील शेतकरी स्त्रीचे योगदान आणि तिचे स्थान महत्त्वाचे आहे. म्हणूनच मराठवाड्यातील ही कोरडवाहू शेती, सिंचनाच्या अपुऱ्या सोयीमध्ये देखील अजूनही टिकून आहे..परिस्थितीशी दोन हात...मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी न बदलणाऱ्या परिस्थिती पुढे हार पत्करून आत्महत्या केल्या. पण त्याच घरातल्या स्त्रीने मात्र आत्महत्येचा मार्ग कधी स्वीकारला नाही. घरचा कर्ता माणूस गेला तरी तिने कच खाल्ली नाही. उलट येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी ती सज्ज झाली. आणि पुन्हा हे आत्महत्येचं भूत आपल्या घरात येणार नाही यासाठी ती हिमतीने उभी राहिली. मराठवाड्यातील शेतकरी स्त्रीचे हे धाडस खूपच कौतुकास्पद आणि विलक्षण असे आहे. ती पदर खोचून हिमतीने येणाऱ्या काळाला अंगावर घ्यायला तयार असते..रानातझाडाला लटकून केलेलीपहिलीच आत्महत्यासाऱ्या गावभर पसरलीआणिघराघरातील सगळ्या बायाहादरून गेल्या....उंबरठ्यापर्यंत आलेली आत्महत्याआता उंबरठ्याच्या मध्येयेऊ द्यायची नाही म्हणूनबायांनी पदर खोचलाआणि हिमतीनेकमरेवर हात ठेवून.उंबठ्याबाहेर येऊन थांबल्या.अजूनपर्यंत तरीआत्महत्येने उंबरठ्याच्या आत येण्याचेधाडस केले नाही...बचतीची मिळाली साथ....घर, मुले, सणवार, पाहुणे-रावळे, बाजारहाट, दुभतं, शेती अशी सगळीच जबाबदारी मराठवाड्यातील शेतकरी स्त्री अगदी कौशल्याने पार पाडत असते. तिच्याकडे व्यवहार कुशलता आहे. ही व्यवहार कुशलता तिने आपल्या अनुभवातून कमावलेली आहे. विहीर साऱ्या शेतीला पाणी पुरवते. सगळ्यांची तहान भागवते. सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. पण त्याचा अर्थ असा नाही, की विहिरीला दुःख नसते. पण विहीर कधी आपलं दुःख उघडं करत नाही. या विहिरीप्रमाणेच मराठवाड्यातील शेतकरी स्त्रीलाही दुःख आहे..पण या दुःखाचा बाजार ती कधी मांडत नाही. छोट्या-मोठ्या संकटाने घाबरून ती रडत बसत नाही. तर पदर खोचून येणाऱ्या संकटावर मात करत पुढे कसं जाता येईल हे ती बघत असते. कठीण प्रसंगी माणसाने हिम्मत ठेवली तर कुठूनतरी मदत मिळतेच. अशा पद्धतीने हिम्मत ठेवणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी स्त्रीच्या मदतीला बचत गट धावून आले आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकरी स्त्रियांनी आपला व्यवहार जिवंत ठेवला आहे. बचत गटाच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक बाजू तर या स्त्रियांनी भक्कम केलीच आहे. पण प्रसंगी पुरुषांना आर्थिक रसद पुरवण्याचं कामही या स्त्रिया करतात..या स्त्रिया फक्त बचत गट करून थांबत नाहीत, तर आपलं जीवन पुढे घेऊन जाण्यासाठी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजीपाला असे छोटे-छोटे जोडधंदे करत असते. हे छोटे जोडधंदे ती स्वतःच्या हिमतीवर करत असते. दुग्धव्यवसाय म्हणजे तिच्याकडे भरपूर जनावरे असतात असे नाही. कुक्कुटपालन म्हणजे तिच्याकडे भरपूर कोंबड्या असतात असे नाही. शेळीपालन म्हणजे तिच्याकडे भरपूर शेळ्या असतात असे नाही. ती भाजीपाला करते म्हणजे पाच-दहा एकरचा भाजीपाल्याचा प्लॉट असतो असे नाही. .तर एखादंच दुभतं जनावर, दोन-चारच कोंबड्या, एकाद-दुसरीच शेळी आणि गुंठाभर भाजीपाला; एवढ्या तुटपुंज्या जोडधंद्यावर ती आपल्या संसाराचा जड गाडा ओढत असते. तिला नटण्या-मुरडण्याची हौस नसते असे नाही. ती प्रसंगानुरूप नटते आणि सजतेही. पण ते तेवढ्यापुरतेच. कारण त्याच्यापेक्षा जगण्याचे प्रश्न तिला महत्त्वाचे वाटतात. आणि म्हणून त्या प्रश्नाशी भिडण्यात आणि त्यांचे उत्तर शोधण्यात ती जो संघर्ष करते तो संघर्ष म्हणजेच आपलं नटणं-मुरडणं आहे; अशी मानसिकता असलेली मराठवाड्यातील शेतकरी स्त्री अगदी धैर्याने आणि जिद्दीने आपली वाटचाल करत आहे.बालाजी मदन इंगळे ९८८१८२३८३३(लेखक साहित्यिक असून ग्रामीण प्रशाला,माडज (जि.धाराशिव) येथे माध्यमिक शिक्षक आहेत).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.