उन्हाळयात अनेकवेळा तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढते. या वाढलेल्या तापमानाचा ताण जनावरावर पडतो. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना अधिक पाण्याची आवश्यकता भासते. या ताणामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीमध्ये जनावरांचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.
बहुतांश पाळीव प्राण्यांच्या शरीराचे तापमान १०० ते १०३ फॅरनहीटच्या दरम्यान असते. उदा. गाय १०१.६ फॅरनहीट, म्हैस १०० फॅरनहीट, घोडा १००.६ फॅरनहीट, शेळी, मेंढी १०२.६ फॅरनहीट, कुत्रा १०१ फॅरनहीट, तर कोंबडीचे तापमान १०७ फॅरनहीट. उन्हाळयाच्या दिवसात बाह्य वातावरणातील तापमान वाढत जाते. अशा वेळी जनावरांचे तापमान एकदम वाढते, श्वासोच्छवास, हृदयक्रिया जास्त तीव्र होतात. तोंडावाटे श्वास घ्यावा लागतो. लघवी कमी प्रमाणात होते. शरीरातील क्षाराचे प्रमाण कमी होते. रक्तदाबही कमी होतो.
उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा उपलब्ध होत नाही किंवा कमी होतो. अशा वेळी जनावरामध्ये अशक्तपणा, तोंड कोरडे पडणे, दूध कमी देणे अशा समस्या दिसतात. या दिवसात जनावराच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. उन्हाळयात हिरव्या वैरणीच्या कमतरतेमुळे जनावरे मिळतील त्या हिरव्या वनस्पती खात असतात. उदा. बेशरम, घाणेरी, धोतरा खाण्यात येतात. यातून अनेकवेळा जनावरांना विषबाधा होऊन जनावरे गुंगल्यासारखी होतात. त्याचे खाणे कमी होते. खाली बसतात व उठत नाहीत. अशी लक्षणे दिसताच ताबडतोब पशुवैद्यकाशी संपर्क साधावा. या दिवसात जनावरांना उष्माघात अतिप्रखर सूर्याच्या उष्णतेमुळे व पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे होतो. उष्माघातामुळे जनावरांच्या शरीराची कातडी कोरडी पडते, जनावरे थकल्यासारखी होतात, भुक मंदावते, दूध देणे कमी होते. यावर उपाय म्हणून जनावरांच्या अंगावर थंड पाणी टाकावे. ओले कापड किंवा गोणपाट जनावरांच्या डोक्यावर ठेवावे, त्यावर वारंवार पाणी मारावे. अशा जनावरांना झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावे. भरपूर प्रमाणात स्वच्छ थंड पाणी व चारा द्यावा. शक्य असल्यास पाण्यात मीठ व साखर मिसळावी. उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याअभावी शेतकरी जनावरांना उसाचे वाढे खाऊ घालतात. वाढे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वाढ्यामधील ऑक्झेलेट खनिज व जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअम एकत्र होवीन मुत्रावाटे निघून जाते. शरीरातील कॅल्शिअमची पातळी कमी होते, त्यामुळे जनावरांना दूधाचा ताप (मिल्क फिव्हर) नावाचा रोग होतो. जनावरे थकून एकदम खाली बसतात. शरीराचे तापमान कमी होते, रवंथ बंद होते, जनावरे खात नाहीत, दूध देणे कमी होते, शरीर थंड पडते, जनावरे मान टाकून बसतात. पशुतज्ज्ञाकडून वेळेवर उपचार करावेत. खाद्यातून मिनरल मिक्श्चर द्यावे. अती उष्ण हवामानाच्या प्रदेशात दुभती जनावरे तीन ते चार वेळा धुवावीत. थंड पाणी फवारावे. जनावरे शक्यतोवर थंड जागी बांधून ठेवावे. गोठ्यात असतील तर गोठ्यात जास्त प्रमाणात हवा खेळती राहावी, या करीता भोवत झाडे लावलेली असावीत. यामुळे सूर्यकिरणे परावर्तित होतात. या सूर्यकिरणापासून जनावरांचे संरक्षण होते. क्षाराची कमतरता भरून काढण्यासाठी पाण्यातून प्रती लीटर १ ते २ ग्रॅम मीठ द्यावे किंवा १५ ते २० ग्रॅम क्षार मिश्रणे चाऱ्यातून द्यावी. गोठ्याच्या छतावर पाणी शिंपडावे. त्यासाठी गोठ्याच्या छपरावर कडबा, तुराट्या याचे आच्छादन करावे. दुभत्या गायी म्हशींना दूध काढण्यापूर्वी किंवा काढल्यावर थंड पाणी पाजावे. जनावरांना उन्हाच्या वेळात चरण्यासाठी फिरवू नये. संकरीत बैलापासून सकाळच्या थंड वेळी अथवा संध्याकाळी शेतीची कामे करून घ्यावी. वाढत्या उन्हाळ्यात उन्हाचा ताण कोंबड्यावर पडतो. अंड्यातील कोंबड्या असल्यास अंड्याचे उत्पादन घटते, त्यामुळे अंड्याचे वजन १० टक्के कमी होते. कोंबडया अशक्त होऊन आजाराचे प्रमाण वाढते. उन्हाळयात कोंबड्याच्या शरीराचे तापमान वाढते. श्वासोच्छवास वाढून कोंबड्या मरतात. मांसल कोंबड्यामध्ये वजन कमी होतात. ज्या प्रमाणात कोंबड्यांनी खाद्य खाल्ले पाहिजे, तेवढे त्या खात नाहीत.परिणामी वजन मिळत नाही. दिवसातून तीनवेळा फिडींग करावे. खाद्यामध्ये हलकेसे पाणी शिंपडावे. सोबत पाण्यामधून जीवनसत्त्वे ए आणि डी योग्य प्रमाणात द्यावे. या महिन्यात मानमोडीची लस द्यावी. अशा परीस्थितीत खुराड्याच्या किंवा छपरावर गवत पसरावे. त्यामुळे तापमान काही प्रमाणात कमी होते. छपराला पांढरा रंग द्यावा. आतील तापमानामध्ये फरक पडतो. छपरावर पाणी शिंपल्यास तापमान कमी होते. खुराड्याच्या बाजूने गोणपाट किंवा पोती लावून ती पाणी शिंपून ओली ठेवावी. उष्ण तापमान वाढलेले असताना कोंबड्याच्या डोक्यावर किंवा शरीरावर थंड पाण्याचा फवारा मारल्यास मृत्यु संख्या ५ टक्क्यांनी कमी होते. संपर्क- डाॅ. आर. एल. काळे, ७३५०२०५७४६ (कृषी विज्ञान केंद्र, करडा, ता. रिसोड जि. वाशिम.)