मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती खाण्यामध्ये आल्यास विषबाधेमुळे बाधित जनावरांमध्ये यकृतबाधा, कावीळ आजार निर्माण होतो. विशेषतः शेळ्या व मेंढ्यांच्या कळपामध्ये या विषबाधेची तीव्रता जास्त असते. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करून बाधित जनावरे सावलीमध्ये ठेवावीत. पावसाळी हंगामात गवत व काही वनस्पतींची वाढ ही खूप मोठ्या प्रमाणात होत असते. चराऊ क्षेत्रामध्ये काही विषारी वनस्पती मोठ्या जोमाने वाढतात. यामध्ये घाणेरी, गुणगुणी किंवा बीर या नावांनी ओळखली जाणारी विषारी वनस्पती प्रामुख्याने चराऊ कुरणांमध्ये आढळून येते. ग्रामीण भागामध्ये सर्रासपणे शेळ्या,मेंढ्या व काही प्रमाणात गायी,म्हशी या रानात चारावयास नेतात. अजाणतेपणे जर जनावरांच्या आहारात अशा विषारी वनस्पती आल्या तर विषबाधा होण्याची शक्यता असते.
शेळ्या व मेंढ्या चरताना रानामध्ये उपलब्ध गवत व वनस्पती यांमधून निवडक घटक आपल्या आहारात घेतात. या सवयीमुळे विषारी वनस्पतीपासून विषबाधा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मरतुक होऊ शकते. घाणेरी वनस्पती खाल्ल्यानंतर बाधित जनावरांमध्ये यकृतबाधा, कावीळ आजार निर्माण होतो. वनस्पतीतील लेंटाडीन नामक विषारी घटक रक्तामध्ये मिसळल्यानंतर असे जनावर सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आल्यास त्यास या विषबाधेची लागण होते. अशा जनावरांत दिसून येणाऱ्या विषबाधेस प्रकाशसंवेदनशीलता असे म्हणतात. या आजाराची लागण प्रामुख्याने दुष्काळ किंवा पावसाळ्याच्या सुरवातीस आढळून येते. विशेषतः शेळ्या व मेंढ्यांच्या कळपामध्ये या विषबाधेची तीव्रता जास्त असते. त्यातून आर्थिक नुकसान होते. प्रकाशसंवेदनशीलता आजाराची लक्षणे
शेळ्या व मेंढ्या कळपाने चारावयास जात असल्याने घाणेरी वनस्पती खाण्यात आल्यास कळपामधील बऱ्याचशा जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. विषबाधेमध्ये प्रामुख्याने जनावरांच्या त्वचेचा जो भाग सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येतो त्या भागामध्ये सूज येते, जोराची खाज सुटणे. त्यामुळे जनावरे झाडाला किंवा भिंतीला शरीर घासतात. कान, डोळ्याच्या बाजूची कातडी, नाक व शेपटी या भागांमध्ये भरपूर सूज आलेली दिसून येते. लघवी गडद पिवळ्या रंगाची होते तसेच डोळ्यातील श्लेष्मपटल त्वचा पिवळ्या रंगाची होते. श्लेष्मपटल त्वचा ही कावीळ आजारामुळे पिवळ्या रंगाची होते. बाधित जनावरांत ताप यणे, पोटाची हालचाल मंदावते, खाणे पिणे मंदावणे किंवा बंद होते. शरीराची खाज शमविण्यासाठी जनावरे शरीराचा बाधित भाग भिंत किंवा झाडाचे खोड यावर वारंवार रगडतात. त्यामुळे घर्षण झालेल्या भागातील कातडी निघून जाते. विषबधेची तीव्रता जास्त असल्यास बाधित जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यातून पशुपालकाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पावसाळ्यादरम्यान घाणेरी वनस्पती खाण्यामुळे मेंढ्या व बैलवर्गीय जनावरांमध्ये प्रकाशसंवेदनशीलता आजाराची बाधा झाल्याचे नियमितपणे आढळून येते. चारावयास नेलेल्या जनावरांमध्ये प्रकाशसंवेदनशीलतेची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ अशी जनावरे सूर्यप्रकाशापासून दूर दाट सावलीमध्ये ठेवावीत. त्यामुळे प्रकाशसंवेदनशीलतेमुळे निर्माण होणाऱ्या सूज येणे, खाज सुटणे अशा लक्षणांची तीव्रता कमी करता येऊ शकते. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करून बाधित जनावरे सावलीमध्ये ठेवावीत. योग्य उपचाराचा अवलंब केल्यास आजाराची तीव्रता कमी होऊन जनावरे लवकर बरी होण्यास मदत होते. जनावरे चारावयास घेऊन जाणाऱ्या पशुपालकांनी चराऊ क्षेत्रात घाणेरी वनस्पती नसल्याची खात्री करावी. मगच जनावरे चरावयास सोडवीत. कोणत्याही परिस्थितीत चरावयास गेलेल्या शेळ्या मेंढ्या किंवा मोठी जनावरे चरताना घाणेरी वनस्पती खाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. - डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३
(पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)