मूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता येतो. जनावरांचे आरोग्य उत्तम राहते. प्रजनन क्षमता उत्तम राहते. चाऱ्याची पौष्टिकता टिकवली जाते. चाऱ्याची पचन क्षमता वाढते.
जनावरांच्या आहारात मूरघास मिसळल्यास आरोग्य आणि प्रजनन क्षमतेसाठी उपयुक्त ठरते. हिरव्या चाऱ्यातील उपलब्ध पोषणमूल्यांचे जतन करण्यासाठी हिरवा चारा योग्य वेळी कुट्टी करून खड्ड्यामध्ये हवाबंद स्थितीत मुरण्यासाठी ठेवला जातो.
मूरघास बनविण्यासाठी चारा पिके एकदल चारा पिके ः मका, ज्वारी, यशवंत, जयवंत, हत्तीगवत इ. द्विदल चारा पिके ः लसूण घास, बरसीम इ. दुय्यम पदार्थ ः उसाचे वाढे, पाचट, गवत, शिल्लक पालेभाज्या, झाडपाला इ.
हिरवा चारा (६५ टक्के पाण्याचे प्रमाण, ३५ टक्के शुष्क भाग) कापून हवाबंद केला जातो, तेव्हा त्यांच्यामध्ये आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. हिरवा चारा जेव्हा कापून खड्ड्यात भरला जातो, तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात, त्यांचे श्वसन चालू असते. त्यामुळे तिथे पाणी व कार्बनडाय ऑक्साईड वायू तयार होतो. जोपर्यंत खड्ड्यामध्ये ऑक्सिजन उपलब्ध असतो, तोपर्यंत ऑक्सिजनवर जगणारे जीवजंतू हे सक्रिय असतात. तसेच चारा दाबून भरल्यामुळे हळूहळू तेथील तापमान (२७ ते ३८ अंश सेल्सिअस) वाढत जाते. हवेतील ऑक्सिजनदेखील कमी कमी होत नाहीसा होतो. त्यामुळे वाढलेली उष्णता आणि कमी होणारा ऑक्सिजन यामुळे जिवाणू तिथे तग धरू शकत नाहीत. ते नष्ट होतात. त्यामुळे चारा खराब होत नाही. या सोबतच काही ऑक्सिजनविरहित हवेमध्ये जगणारे जिवाणूदेखील असतात. जेव्हा चाऱ्यामध्ये ६५ ते ७५ टक्के पाण्याचे प्रमाण आणि मुबलक प्रमाणात साखर उपलब्ध असते, तेव्हा हे जिवाणू सक्रिय होतात. त्यामुळे लॅक्टिक आम्ल निर्माण होते. लॅक्टिक आम्ल तयार झाल्यामुळे खड्यातील सामू कमी होतो व तापमान वाढते. यामुळे चारा खराब करणाऱ्या जीवजंतूची वाढ या ठिकाणी होत नाही. जमिनीत खड्डा खणून प्लॅस्टिक बॅग, प्लॅस्टिक टाकी, सिमेंटच्या टाकीमध्ये बनविता येतो. हिरवा चारा चिकात किंवा ५० टक्के फुलोऱ्यात असताना कापून एक दिवस सुकवावा. उन्हाळ्यात ५ ते ६ तास सुकवल्यास २० ते २५ टक्के चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यानंतर चाऱ्याची एक ते दीड इंचाची कुट्टी करून घ्यावी. कुट्टी केलेला चारा दोन्ही हातांनी दाबून बघावा, जर गोळा झाला तर पाण्याचे प्रमाण जास्त आहे असे समजावे. चारा मोकळा राहिला तर चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण मूरघास बनवण्यासाठी योग्य आहे असे समजावे. कुट्टी केलेला चारा मूरघास बॅग किंवा खड्ड्यात भरून घेताना चार बोटाचा थर करावा. त्या चाऱ्यावर दाब देऊन हवा काढावी. यानंतर या थरावर गुळाचे पाणी, मळी, क्षारमिश्रण, मिठाचे पाणी, कल्चर योग्य प्रमाणात मिसळावे. (गूळ/मीठ/क्षारमिश्रण १०० किलो चाऱ्यास १ किलो) कल्चर तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरावे. प्रत्येक थराला या प्रमाणे प्रक्रिया करावी. बॅग/खड्डा भरल्यानंतर शेवटच्या थरावर वाळलेला पालापाचोळा, दुय्यम पदार्थ, याचा थर करावा. जेणेकरून वरच्या थराला हवा लागून जास्त चारा काळा पडणार नाही. त्यानंतर खड्डा/बॅग चांगली पॅक करून हवा बंद करावी. मूरघासमध्ये गूळ, मीठ, क्षारमिश्रण वापर केला असेल तर चारा हवाबंद स्थितीमध्ये ४५ दिवस ठेवावा. कल्चर वापरले असेल तर चारा हवाबंद स्थितीमध्ये २२ दिवस ठेवावा.गरजे एवढा मूरघास काढून जनावरांना खायला द्यावा.मूरघास काढल्यानंतर खड्डा/बॅग पुन्हा झाकून बंद करावा. मूरघास खाऊ घालताना जनावरांच्या आहारात हळूहळू वापर करावा. मुरघाचा सामू आम्लधर्मीय असतो. त्यामुळे जनावरांना अचानक जास्त प्रमाणात मूगघास खाऊ घातल्यामुळे आम्लधर्मीय अपचन होण्याची शक्यता असते. ज्या वेळी २० ते २५ किलो मूरघास देण्याची वेळ येईल, त्यावेळेस ३० ते ४० ग्रॅम खायचा सोडा जनावरांना द्यावा. - डॉ. श्रद्धा राऊत ९२७०७०६००३ - डॉ. प्रफुल्लकुमार पाटील ८३२९७३५३१४ (पशुपोषण आहारशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महविद्यालय, उदगीर, जि. लातूर)