गाई, म्हशी गाभण असताना शेवटचे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. कोरडा चारा दुधात फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक आहे. जास्त ऊर्जेसाठी खाद्यपुरके दिल्यास गाभणकाळ आरामदायी होतो. शेवटच्या गाभण काळात आणि व्यायल्यानंतर सुरुवातीच्या काळात भूक कमी असल्याने लवकर पचणारा व भरपूर पोषणमूल्ये असणारा आहार द्यावा.
पशूपालकांसाठी सध्याचा काळ खूप महत्त्वाचा आहे कारण गाभण गाई, म्हशींचे विणे सुरु होईल.शेवटच्या ३ महिन्यांचा गाभणकाळ अतिशय संवेदनशील आहे. सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या गाभणकाळात नेहमीचे खाद्य आणि चारा आपण देऊ शकतो परंतु शेवटच्या तीन महिन्यांमध्ये जनावरांच्या पोटाचा काही भाग वासराने व्यापल्यामुळे पचनाला चांगले खाद्य देण्याची गरज असते. खाद्य दोन ऐवजी चार वेळा विभागून दिल्यास पोटावर अतिरिक्त ताण येत नाही. प्रसूती जवळ आल्यावर पचनाला सोपे खाद्य दिल्यास प्रसूती सुलभ व्हायला मदत होते. गाभण काळ आणि व्यायल्यानंतर ऊर्जेची गरज
गाभण काळातील शेवटच्या दोन महिन्यात गाय किंवा म्हैस दूध देत नाही, यावेळेस ती पुढील वेताची तयारी करते. या काळात योग्य आहार दिला गेला तर प्रसूती व्यवस्थित होऊन दूध उत्पादनात सातत्य राहते. शेवटच्या ३ महिन्यात गर्भाशयातील वासराची सुमारे ६५ टक्के वाढ होते. त्यामुळे गाभण काळात प्रथिनांबरोबर ऊर्जेची गरज पूर्ण करणेसाठी ऊर्जायुक्त पूरक आहार द्यावा. यामुळे गर्भाशयातील वासराची नीट वाढ होते. गायीच्या शरीरात चरबीच्या रूपाने ताकद साठून राहते. तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) ३.५ ते ४ यादरम्यान राहण्यास मदत होते. व्यायल्यानंतर होणारे दुधाचा ताप किंवा मिल्क फिवर, किटोसीस इत्यादी आजार होत नाहीत. शेवटच्या गाभण काळातील पशुआहार
ट्रान्जिशन फीड २.५+२.५ = ५ किलो किंवा शरीर वजनाच्या १ टक्के देणे आवश्यक आहे. १० ते १५ ग्रॅम कोलिन व १०० ग्रॅम बायपास फॅट द्यावे. शेवटच्या तीन महिन्यातील गाभण काळात मिनरल मिक्श्चर पूर्णपणे बंद करावे. हिरवा तसेच कोरडा चारा गरजेनुसार द्यावा. व्यायल्यानंतर सुरुवातीला दुभत्या गाई-म्हशींची भूक कमी असते. अशा वेळेस जास्त ऊर्जा व जास्त पचनीय प्रथिने असलेला आहार द्यावा. जेणेकरून शरीराला कमी खाद्यामध्ये जास्त पोषणतत्त्वे मिळू शकतील. चांगल्या प्रतीच्या आहारासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. गाई-म्हशी व्यायल्यानंतरचा आहार
व्यायल्यानंतर ३५ ते ४५ दिवसापर्यंत गायी-म्हशींचे दूध वाढत जाते, या काळात जितके जास्त दूध आपल्याला मिळवता येईल तितके त्या वेतातील एकूण दूध उत्पादन वाढते. या काळात ऊर्जेची कमतरता (निगेटिव्ह एनर्जी) दिसून येते. तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोर) खालावतो, कारण दुधावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. या वेळेस गाय उलटण्याचे प्रमाण वाढते, कारण नवीन वासरू जन्माला घालण्यासाठी लागणारी ऊर्जा शरीरात कमी पडते. शरीरातील चरबी यकृतावर (लिव्हर) जमा होऊन फॅटी लिव्हर आजार होण्याची शक्यता असते. शरीरासाठी लागणारे ग्लुकोज यकृत पूर्ण क्षमतेने तयार करू शकत नाही. यामुळे गाय एकूण तिच्या क्षमतेपेक्षा कमी दूध व फॅट उत्पादन करते. ऊर्जेची कमतरता भरून काढल्यास पूर्ण क्षमतेने दूध व फॅट उत्पादन घेणे शक्य होऊन जनावर वेळेवर गाभण राहण्यासही मदत होते. शरीरात कॅल्शिअमची उपलब्धता वाढविण्याचे उपाय
शेवटच्या गाभण काळात कमी पोटॅशियम व कमी सोडियम असलेला आहार द्यावा. मॅग्नेशियमचे प्रमाण मात्र वाढवावे. पशू आहारामधील मीठ व सोडा यांचा वापर कमी करावा. यामुळे रक्ताचा सामू आम्ल स्वरूपाचा राहण्यास मदत होईल. जेणेकरून संप्रेरके हाडांमधील व आतड्यामधील कॅल्शिअम दुधासाठी जास्त प्रमाणात उपलब्ध करू शकतील. काही खाद्य पुरके वापरून शरीरातील रक्ताचा सामू आम्ल स्वरूपाचा करून दुभत्या गाई, म्हशींना होणाऱ्या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. गाभण काळात कमी कॅल्शिअम व जास्त मॅग्नेशिअम अशा स्वरूपात खनिजांची उपलब्धता ठेवावी. गाभण काळात जास्त कॅल्शिअम दिला गेल्यास तो शरीरात शोषला जाण्याची क्रिया मंदावते. कारण दूध उत्पादन नसल्यामुळे कॅल्शिअम शरीरात शोषून घेणाऱ्या रिसेपटर्सचे कार्य मंदावते, याचा फटका गाय, म्हैस व्यायल्यावर बसतो. कारण व्यायल्यावर तोंडावाटे दिलेला कॅल्शिअम शरीरात कमी शोषला जातो. दुधाचा ताप हा आजार होण्याची शक्यता बळावते. व्यायल्यानंतर रोग प्रतिकार क्षमता कमी झालेली असते. यामुळे कासेचा दाह व गर्भाशयाचा दाह आजार होतात. गाय, म्हैस व्यायल्यानंतर कॅल्शिअमची गरज
गाय, म्हैस व्यायल्यानंतर ग्लुकोजबरोबरच कॅल्शिअमची गरज वाढते. पहिल्या दिवशी ही गरज तीन पटींनी जास्त असते. यावेळेस चीक किंवा दुधावाटे कॅल्शिअम शरीराबाहेर जातो. त्यामुळे पहिल्या आठवड्यात कॅल्शिअमची कमतरता जास्त असते. चीक व दूध निर्मितीला कॅल्शिअम कमी पडू नये म्हणून शरीरातील संप्रेरके हाडांमधील कॅल्शिअम काढून रक्तामधील त्याचे प्रमाण वाढवितात. परंतु जेव्हा खाद्यामध्ये पोटॅशियम व सोडियम चे प्रमाण जास्त असते, तेव्हा या घटकांचे रक्तातील प्रमाण वाढून रक्ताचा सामू अल्कली स्वरूपाचा बनतो. जास्त पोटॅशियममुळे मॅग्नेशियमची उपलब्धता कमी होते. त्यामुळे शरीराची कॅल्शिअमची कमतरता ओळखण्याची क्षमता कमी होते. यामुळे संप्रेरकांचे रक्तातील प्रमाण कमी होते. शरीरातील कॅल्शिअम दूध उत्पादन व इतर शारीरिक कामांसाठी उपलब्ध केला जात नाही किंवा खाद्यातील कॅल्शिअम कमी शोषला जातो. -डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९, (लेखक पशुआहार व व्यवस्थापन तज्ज्ञ आहे)