टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी संवर्धनात पाण्याचा मर्यादित वापर, पर्यावरण विषयक चिंता, जमिनीची किंमत आणि खाद्यावरील खर्च आटोक्यात आणण्याकरता बायोफ्लाक तंत्रज्ञान फायदेशीर ठरले आहे.
जैवपुंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञानामुळे सघन मत्स्य संवर्धन पद्धतीमध्ये पाण्याचा सुयोग्य वापर होतो. अधिक जैव सुरक्षा आहे. खाद्य कमी लागते, त्यामुळे खाद्यावरील खर्च कमी होतो. उत्पादित मासळीचा दर्जा अतिशय उच्च असतो, त्यामुळे बाजारपेठेत चांगली किंमत मिळते. मात्र जैवपुंज तंत्रज्ञानामध्ये जास्त भांडवली गुंतवणूक करावी लागते. जैवपुंज तंत्रज्ञानाची सुरुवात फ्रान्समध्ये झाली. समुद्रातील कोळंबी संवर्धनात असलेल्या समस्या सोडविण्याकरिता जे विविध उपाय शास्त्रज्ञाने पडताळून पाहिले. त्यातून जैवपुंज तंत्रज्ञान विकसित झाले (१९८०). टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी संवर्धनात पाण्याचा मर्यादित वापर, पर्यावरणविषयक चिंता, जमिनीची किंमत आणि खाद्यावरील खर्च आटोक्यात आणण्याकरता असे प्रयोग करण्यात आले. जैवपूंज तंत्रज्ञानाचा पहिला यशस्वी व्यावसायिक प्रयोग १९८८ मध्ये फ्रान्समधील माहिटी येथे झाला. याठिकाणी दहा गुंठे क्षेत्रातील सिमेंट कॉंक्रीटच्या तलावातून २० टन प्रति हेक्टरी प्रतिवर्ष उत्पादन घेण्यात आले. त्यानंतर अमेरिकेतील बेलीज अॅक्वाकल्चर फार्म येथे १.६ हेक्टर जलक्षेत्रातील प्लॅस्टिक लायनिंग तलावातून २६ टन मत्स्य उत्पादन घेण्यात आले आणि जैवपूंज तंत्रज्ञान मत्स्यशेतीकरिता योग्य असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अमेरिकेत सुमारे ५७० घनमीटर पाण्यात अति सधन पद्धतीने केलेल्या कोळंबी शेतीतून ४५ टन उत्पादन घेण्यात आले. मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च करून उच्च प्रतीचे जैविक धोक्यांचे व्यवस्थापन करणे, हे अशा व्यावसायिक प्रयोगाचे उद्दिष्ट होते. सन १९९० च्या दशकात इस्राईल आणि अमेरिकेने तिलापिया आणि व्हनामी कोळंबी संवर्धनाचे यशस्वी प्रयोग केले. रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयात जैवपुंज तंत्रज्ञानाचे प्रयोग घेण्यात आले असून, मत्स्यबीज ते मत्स्य बोटुकली उत्पादनात जैवपुंज तंत्रज्ञान उपयोगी असल्याची शिफारस करण्यात आली आहे. - डॉ. केतन चौधरी ९४२२४४११७८ (मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी)