कुक्कुटपालन व्यवसायात ६५ टक्के फायदा व्यवस्थापनावर अवलंबून असतो. महाराष्ट्रात वर्षभर सारखे तापमान नसते. पठारी भागात उन्हाळ्यात खूप उष्णता तर हिवाळ्यात खूप थंडी असते. तर समुद्रकिनाऱ्यालगतच्या, उदा. कोकणात बाष्पाच्या जास्त प्रमाणामुळे दमटपणा तसेच पावसाचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे ऋतुमानानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावे लागतात.
शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावी. कोंबड्यांना पिण्यासाठी स्वच्छ अाणि थंड पाणी द्यावे. स्प्रिंकलर व फाॅगर लावून शेडमधील तापमान कमी करावे. कोंबड्यांना दुपारी खाद्य न देता सकाळी किंवा सायंकाळी द्यावे. पाण्यामधून तज्ज्ञांच्या सल्ल्याने साखर ग्लुकोज १० ग्रॅम/लिटर, इलेक्ट्रोलाइट, विटामीन सी मिसळून द्यावे. त्यामुळे उष्णतेमुळे कोंबड्यांवर येणारा ताण कमी होतो. दूषित पाण्यामुळे कोलाय बॅसीलाॅसीससारखे आजार होतात, म्हणून जंतुनाशके पाण्यातून द्यावीत. शेडचे छप्पर पांढऱ्या रंगाने रंगवून घ्यावे. शेडमधील कोंबड्यांची संख्या कमी करून जास्तीत जास्त जागा द्यावी. गादी कोरडी राहील याची काळजी घ्यावी. अोलसर गादीमुळे शेडमधील अमोनिया वायूचे प्रमाण वाढते. वेळोवेळी गादी खालीवर करून घ्यावी जेणेकरून त्यातील ओलावा कमी होईल. गादी अगदीच ओली झाली असल्यास तेवढाच भाग काढावा व त्याठिकाणी नवीन लिटर अंथरावे. अधूनमधून लिटरमध्ये खालीवर करून चुना मिसळावा. शेडवर, सिमेंटचे पत्रे असतील तर दिवसातून ३ ते ४ वेळा पाण्याचा फवारा मारावा. शेडच्या चारी बाजूस ३० मीटर अंतरावर सरळ उभी वाढणारी झाडे लावावीत, म्हणजे तापमान कमी होईल व शुद्ध हवा मिळेल. जमल्यास शेडमध्ये पंखे, एक्झॉस्ट फॅन लावावेत. हवा अधिक उष्ण अाणि तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असेल शेडच्या छतावर, बाजूच्या जमिनीवर थंड पाणी शिंपडावे म्हणजे थोडा थंडावा निर्माण होईल. कोंबड्यांच्या अंगावर तुषार पडेल अशा रीतीने शेडमध्ये फॉगर बसवावेत, त्यामुळे थंडावा वाढतो. शेडच्या उघड्या बाजूस ओले पोते लावावे. खाद्य सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी द्यावे. लसीकरण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात करावे. जीवनसत्त्वे सी, अ, क्षार अाणि प्रथिने योग्य प्रमाणात दिल्यास उष्णतेचा ताण कमी होऊन मरतुक कमी होते. उष्णतेमुळे होणारे बदल कोंबड्या खाद्य कमी खातात. कोंबड्यांची वाढ कमी होऊन वजनामध्ये घट होते. उत्पादन व प्रजनन क्षमता अाणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. कोंबड्या पाण्यामध्ये चोच, पिसे बुडवून बसतात. विषाणूंमुळे होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे मरतुकीचे प्रमाण वाढते.
संपर्क : डॉ. ज्योत्स्ना खोब्रागडे, ९४२०६४२४०९ (नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर)