पशुपालक आणि पशुवैद्यकांनी प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणीचा वापर कासदाह तसेच इतर संसर्गजन्य जिवाणूजन्य आजार रोखण्यासाठी करावा. प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी करून आपणास प्रतिजैविकांच्या अनिर्बंध वापरावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. पशुपक्षिपालन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात देशात आणि जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आहे. त्याच बरोबर शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहेत. संकरित जनावरे आणि पशुपक्ष्यांमध्ये आधुनिकीकरणामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सतत औषधोपचारांची गरज असते. त्यामुळे पशुपक्ष्यांच्या उपचाराबाबत औषधशास्त्राचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. परंतु औषधोपचार करताना आपल्या देशात जनावरांच्या बाबतीत बऱ्याचदा गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. नियम कडक आहेत पण ते पाळले जात नाहीत. पशुवैद्यकाऐवजी इतर मंडळी औषधोपचार मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत. बनावट औषधांमध्ये परिणामकारक घटक नसतात किंवा कमी प्रमाणात असतात. अशा औषधांमध्ये दुष्परिणामकारक घटक अधिक आढळून येतात. यामुळे पशुपालकांचे नुकसान होते. प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी’ चे महत्त्व
जनावरांना सतत तीच औषधे कमी प्रमाणात दिली गेली तर संसर्गजन्य जिवाणू त्या प्रतिजैविकांना प्रतिरोध करण्यास जास्त समर्थ होताना दिसतात. मग यावर उपाय म्हणून इतर वेगवेगळी आणखी जास्त क्षमता असलेली नवनवीन प्रतिजैविके व्यावसायिक कंपन्या बाजारात आणतात. पशुवैद्यकांच्या हातात येणारी प्रतिजैविके योग्य क्षमतेची आहेत की नाही याची काही वेळा खात्री नसते. प्रतिजैविकांची क्षमता सिद्ध करण्यासाठी असलेले परीक्षण प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी करून घेतली जात नाही. याचा परिणाम प्राथमिक आजार नीट बरा न झाल्याने होणाऱ्या दुय्यम गंभीर स्वरूपाच्या (उदा. बुरशीजन्य आजार) आजारात बघायला मिळते. परंतु अदृश्य स्वरूपात होणाऱ्या इतर दुष्परिणाम देखील मोठे आहेत. प्रतिजैविके किती मात्रेत कशी द्यायची, याची माहिती नसते. औषध देण्याची यंत्रणा आणि हातांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण केलेले नसते. या गोष्टी प्रतिजैविके देताना महत्त्वाच्या असतात. ही शास्त्रीय काळजी फक्त तज्ज्ञ पशुवैद्यक घेऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये ‘प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी’चे महत्त्व वाढत आहे. जिवाणूजन्य आजारावर उपचार करताना प्रामुख्याने प्रतिजैविकांचा वापर केला जातो. या प्रतिजैविकांचा वापर योग्य मात्रेमध्ये आणि योग्य कालावधीसाठी केला नाही, तर उपचारादरम्यान जीवाणूंमध्ये अशा प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिरोध निर्माण होतो. ही प्रतिजैविके संबंधित आजारास नियंत्रणात आणण्यात निष्फळ ठरतात.आजार बरा होण्याऐवजी वाढतो. या प्रतिजैविकांचा दुष्परिणाम जनावरे आणि परिणामी प्राणिजन्य अन्न खाणाऱ्यांच्या शरीरावर होताना दिसतो. प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी
जिवाणूंमध्ये वाढत चाललेली प्रतिजैविकांच्या विरुद्धची प्रतिरोधशक्ती एक जागतिक समस्या आहे. प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी ही समस्या सोडवण्यासाठी केली जाऊ शकणारी एक अतिशय महत्त्वाची उपाययोजना आहे. या चाचणीद्वारे आपणास वापरता असलेल्या प्रतिजैविकास रोगांमध्ये आढळून येणारा जिवाणू कसा आणि किती प्रतिसाद देतो याचे परीक्षण करता येते. परीक्षणाच्या आधारे संवेदनशीलता दाखविणाऱ्या प्रतिजैविकांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य मात्रा आणि योग्य कालावधीसाठी केला तर उपचारास सकारात्मक प्रतिसाद मिळातो. तसेच उपचारानंतर आजार बरा होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढते. प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी करून प्रतिजैविकांच्या अनिर्बंध वापरावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. प्रतिजैविकांचा प्रमाणित वापरामुळे वाढणारी ‘प्रतिजैविक प्रतिरोध’ ही समस्या काही प्रमाणात नियंत्रणात आणता येते. प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात केली जाते. सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सदर चाचणी अतिशय कमी खर्चामध्ये उपलब्ध आहे. या चाचणीद्वारे असंख्य दुर्धर आजारांवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळते. पशुपालक आणि पशुवैद्यकांनी या चाचणीचा वापर कासदाह तसेच इतर संसर्गजन्य जिवाणूजन्य आजार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात करावा. सध्या प्रतिजैविकांच्या वापरासंबंधी जागृती अभियान पशुपालकांसाठी फायदेशीर आहे. संपर्क ः डॉ. डी. एम. मुगळीकर, ९८६००४५९०० (सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जि. सातारा)