बहुतांश टोमॅटो उत्पादक संकरित वाणांचाच वापर करतात. या पिकात फवारण्याही खूप होतात. उत्पादन खर्च भरमसाट असतो. या पार्श्वभूमीवर सुभाष शर्मा यांची टोमॅटोची कमी खर्चिक ‘रेसिड्यू फ्री’ शेती अभ्यासण्याजोगी आहे. ते सांगतात की लागवड करताना एकाच वेळी उत्पादन मिळेल, या उद्देशाने झाडांची संख्या जास्तीत जास्त ठेवतो. हा देशी वाण आहे. पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान रोपे टाकतो. दहा ते १५ ऑक्टोबरमध्ये पुनर्लागवड होते. मार्चपर्यंत प्लॉट संपून जातो. टोमॅटो शेतीची वैशिष्ट्ये
व्यवस्थापनातील बाबी
अपेक्षेपेक्षा साध्य उत्पादन शर्मा सांगतात की, लागवड करतेवेळीस काळ्या आईला प्रार्थना करतो की नैसर्गिक पध्दतीचा वापर असल्याने एकरी ५० क्विंटल (पाच टन )उत्पादन मिळाले तरी त्यात समाधानी आहे. एकरी झाडांची संख्या १५ हजार व प्रति झाड अर्धा किलो उत्पादन साध्य झाले तरी एकरी साडेसात टन म्हणजे अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन मिळण्याची संधी असते. मागील वर्षी अर्धा एकर प्लॉट होता. त्याचे उदाहरण घ्यायचे तर प्रतिझाड अर्धा, एक, दीड, दोन ते काही ठिकाणी कमाल तीन किलोपर्यंतही फळे झाडांना लदबदलेली होती. प्लॉट भरात असताना साठ दिवसांच्या काळात दररोज १५ क्रेट म्हणजे तीन क्विंटलच्या वर मालाची तोडणी केली. म्हणजेच बाजारपेठेच्या सुट्ट्यांचे वार वगळता दररोज त्या आसपास मालाची विक्री झाली. किलोला २८ रूपयांपासून ते किमान ८ रूपयांपर्यंत दर मिळाला. प्रत्येक झाडाला दीड किलो टोमॅटो व एकरी १५ हजारांपर्यंत झाडे धरली तरी एकरी उत्पादन साडे २२ टनांपर्यंत म्हणजेच अर्ध्या एकरांत सव्वा ११ टन उत्पादन मिळाले. सरासरी दर १५ रूपये गृहीत धरला तरी तेवढ्या क्षेत्रात एक लाख ६८ हजार तर एकरी तीन लाख ३५ हजार रुपयांपर्यंत उत्पादन होते. प्रति झाड एक किलो फळांप्रमाणेही हे उत्पादन एकरी १५ टनांपर्यंत होतेच. अत्यंत कमी खर्चात उद्देश साध्य प्लॉटला कोणतीही काडी, मांडव, तार बांधलेली नाही की खांब उभारलेला नाही. घरचेच खत, शिवाय कोणतीही रासायनिक फवारणी नाही. बियाणं घरचं म्हणजे देशी. म्हणजे त्यावरील काही हजार रूपयांचा मोठा खर्च नाही. तरीही एकरी साडे २२ टनांपर्यंत उत्पादनापर्यंत मजल मारणे शक्य झाले. तरीही नुकसानीत गेले नसतो... शर्मा म्हणतात की नैसर्गिक शेती आणि अत्यंत कमी खर्चात उत्पादन हाच या प्रयोगाचा मुख्य गाभा आहे. या टोमॅटोला किलोला दोन रूपयेच दर मिळाला असता तरी नुकसानीत गेलो नसतो की कर्जबाजारी झालो नसतो. प्लॉट गारपिटीत सापडला असता तरी प्रचंड खर्चाचं ओझं झालं नसतं. हीच नैसर्गिक शेतीची खरी ताकद आहे. रासायनिक शेतीत तुम्ही मोठा खर्च केलेला असतो. त्यामुळे कोणतीही आपत्ती किंवा गारपीट झाली तर चार वर्षे तरी सावरण्याची संधी मिळत नाही. अर्थशास्त्र तर मजबूत केलंय ना! शर्मा म्हणाले की काही तज्ज्ञ माझा टोमॅटोचा प्लॉट पाहण्यासाठी आले. त्यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली, की तुमच्या काही झाडांवर बोकड्या आहे, अळी आहे. उत्पादन निश्चित घटणार. त्यावर मी म्हणालो, की माझं ‘टार्गेट’ होतं ५० क्विंटलचं. प्रत्यक्षात उत्पादन काही पटींनी अधिक मिळालं. तेवढ्यावर मी समाधानी आहे. आता त्याच्या पलिकडे मला दाखवूच नका की बोकड्या आहे की कोकड्या ते ! त्याचं नियंत्रण तर होणारच. पण माझं अर्थशास्त्र मजबूत झालंय ना? मग झालं तर! देशी गोसंवर्धन, कंटूरवर चारा नैसर्गिक शेती म्हटले, की शेणखत आले. त्याशिवाय जमिनीची सुपीकता वाढू शकणार नाही या हेतूने पारवा फार्ममध्ये सुमारे ७० देशी गायींचे (लहान-मोठ्या मिळून) पालन केले आहे. प्रति गाय दररोज २५ किलो चारा (२० किलो हिरवा अधिक ५ किलो सुका) लागतो. त्याची वार्षिक किंमत सुमारे सोळा लाख रुपयांपर्यंत होते. हा खर्च कमी करण्यासाठी पाच एकरांवर मका पिकवण्यात येत आहे. शिवाय उडीद, तूर व अन्य पिकांचे कुटार जोडीला आहेच. मक्याचे चांगले उत्पादन मिळावे म्हणून ‘कंटूर फार्मिंग’ केलं. कुठेही नजर फिरवा सगळं पीक एकसमान दिसते. निव्वळ खडकाळ जमिनीवर अत्यंत पौष्टीक हिरवागार चारा तयार केला. उत्पादन दुप्पट घेतलं. कंटूरवर तो घेतला नसता तर चार फुटांपेक्षा उंच जाण्याची शाश्वती नव्हती. पण कंटूर पध्दतीतून तो उन्हाळ्यात १२ फूट उंच वाढला. थंडीत वाढ कमी असली तरी उष्णतेत वाढ वेगाने होते. कारण त्याला उष्णता मानवते. शिवाय एकरी चार ट्रॉली शेणखताचा वापर केला. काळ्या आईसोबत प्रेम कसे ओतावे हे एकदा कळले की ती देखील तसेच प्रेम आपल्यावर ओतते. हिरवा व सुका मिळून एका वर्षात तब्बल साडे पाचशेटन चारा उपलब्ध केला. गरजेनुसार काही खरेदीही केला. एक प्रयोग, अनेक बाबी साध्य चारा उत्पादनातून खर्चात बचत झालीच. शिवाय सर्व गायींचे पोषण झाले. इथेही चक्र आहे. चाऱ्याने जमिनीतून पोषकद्रव्ये घेतली. तो जनावरांच्या पोटात गेला. शेणाच्या रूपाने ती अन्नद्रव्ये पुन्हा जमिनीला मिळाली. शेणखतात जीवाणूंची सर्वात जास्त निर्मिती आहे. म्हणजेच पोषकता, जमिनीची सुपीकता, पिकांचं नियोजन, जनावरांचं संगोपन अशा साऱ्या बाबी आम्ही एकाच प्रयोगात साध्य केल्या. नैसर्गिक दूधाचे पैसे नैसर्गिक चारा आणि दूधही नैसर्गिकच. त्यामुळे येत्या काळात लिटरला ८० ते ९० रुपये दराने ते विकण्याचे व नफा कमावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पाणी, माती, पर्यावरण यांचे संवर्धन महत्त्वाचे आहेच. पण शेतीतील प्रत्येक बाबीतून पैसा कसा मिळवता येईल, हा व्यावहारिक दृष्टिकोनही हवा असे शर्मा सांगतात.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.