नाशिक : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाशी संबंधित गेल्या तीन वर्षांत १६ हजारांहून अधिक कामे झाली असून, तब्बल ६४ अब्ज ६३ कोटी ७० लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. या कामांमुळे ओझरखेड धरण भरेल, एवढी पाणी साठवण क्षमता नव्याने निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
नाशिक जिल्ह्यात येवला, नांदगाव, सिन्नर, बागलाण, मालेगावसह अनेक तालुके वर्षानुवर्षे टंचाईच्या झळा सोसत आहेत. यामुळे गावांना टंचाईमुक्त करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविण्यास सुरवात केली.
पावसाचे पाणी शिवारातच अडविणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाणीवापर कार्यक्षमतेत वाढ करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे करणे, निकामी झालेले बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता पुन्हा स्थापित करून पाण्याची उपलब्धता वाढविणे हा या योजनेचा उद्देश
होता.
या योजनेअंतर्गत २०१५-१६ ते २०१७-१८ या कालावधीत जिल्ह्यातील ६४० गावांमध्ये एकूण १६ हजार ८५९ कामे करण्यात आली आहेत. त्याद्वारे जिल्ह्यात ६४ हजार ७२७ टीसीएम (थाउजंड क्युबिक मीटर) पाणी साठवण क्षमता निर्माण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. म्हणजेच ही क्षमता २ हजार २८२ दशलक्ष घनफूट एवढी असून, ही क्षमता ओझरखेड धरणापेक्षा जास्त आहे. लिटरमध्ये याबाबतचा अंदाज घ्यावयाचा झाल्यास ६४ अब्ज ६३ कोटी ७० लाख लिटर पाणी साठवण क्षमता वाढली आहे.
या पाण्यामुळे लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. ‘जलयुक्त’च्या कामांमुळे अनेक गावांच्या विहिरींमधील पाण्याची पातळी एक ते दीड मीटरने वाढल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ५४ प्रकारची कामे हाती घेण्यात आली. साखळी सिमेंट बंधारे, काँक्रीट नाला बंधारे, नाला खोलीकरण व रुंदीकरण आदी प्रकारची बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत. २०१७-१८ मध्ये १८० गावांत ३० टक्क्यांहून कमी कामे झाली आहेत. १२ गावांत ५० टक्क्यांहून अधिक तर नऊ गावांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक कामे झाली आहेत.