नगर : जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात ७०.७१ टक्के पेरणी झाली आहे. गहू, हरभरा वगळता कोणत्याही पिकांची सरासरी एवढी पेरणी झालेली नाही. आतापर्यंत रब्बीतील सुमारे तीस टक्के क्षेत्र पेरणीविनाच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्वारीचे सरासरीच्या तुलनेत तब्बल ३९ टक्के क्षेत्र पेरणीविना राहिले असून ६१ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.
जिल्ह्यामध्ये यंदा सुरवातीपासून चांगला पाऊस झाला; मात्र मध्यंतरीच्या काळात पावसाने मारलेल्या दडीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले. सुरवातीला अपुरा पाऊस आणि त्यानंतर बोंड अळीचा कापसाला फटका बसला. नंतरच्या काळात झालेल्या पावसामुळे रब्बी चांगला येईल असे वाटत असले तरी सध्याच्या कृषी विभागाच्या रब्बी पेरणीच्या अहवालानुसार आतापर्यंत सरासरीच्या तीस टक्के क्षेत्र पेरणीविना राहिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्याचे रब्बीचे सरासरी क्षेत्र सहा लाख ४५ हजार ९९ हेक्टर आहे. त्यातील ४ लाख ५६ हजार १६१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गहू आणि हरभऱ्याच्या पेऱ्याने सरासरी गाठली आहे. ज्वारीचे मात्र तब्बल ३९ टक्के हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिले आहे. तेलबियांच्या पेऱ्यांत कमालाची घट झालेली असून, दहा टक्केही पेरणी झालेली नाही.
प्रमुख पीकनिहाय पेरणी क्षेत्र (कंसात एकूण क्षेत्र, हेक्टर) ः ज्वारी ः २,८८,६८५ (४,६५,७४८), गहू ः ६९,३८४ (६९,४६१), मका ः १०,४०७ (७३७७), हरभरा ः ८५,४५३ (३७९५), करडई ः २७३ (६३६१), तीळ ः ५७ (१७५), जवस ः ११ (४७४), सूर्यफूल ः २३ (५३८).