पुणे ः दिवसेंदिवसे शेतीकामांसाठी मजुरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी हळूहळू यांत्रिकीकरणाकडे वळू लागले आहेत. पुणे जिल्ह्यात गहू पीक काढणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकरी यंत्रांचा वापर करून गव्हाची काढणी करू लागले आहेत. त्यामुळे वेळेची मोठी बचत होत आहे.
यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात गव्हाची ६० हजार ४९ हेक्टर सरासरीक्षेत्रापैकी ४७ हजार ९६० हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही पेरणी शेतकऱ्यांनी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत केली. साधारणपणे साडेतीन ते चार महिन्यांनी गव्हाची काढणी केली जाते. मात्र, दरवर्षी पीक काढणीच्या वेळेस मजुरांचा प्रश्न कायम शेतकऱ्यांना भेडसावतो. त्यामुळे काढणीस विलंब होऊन काही वेळेस अधिक नुकसान होते. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यास सुरवात केली आहे.
जिल्ह्यातील पूर्वेकडील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर आणि उत्तरेकडील आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी होते. त्यामुळे अनेक शेतकरी मळणी यंत्राचा, तसेच हार्वेस्टरचा उपयोग करतात. त्यामुळे कमी वेळेत गव्हाची काढणी होते.
पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुके भात पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या पटट्यात शेतकरी पीक बदल करत आहे.
त्यामुळे या भात पट्ट्यातही अनेक शेतकरी गहू, हरभरा अशी विविध पिके घेऊ लागले आहेत.
डोंगराळ भाग असल्याने या भागात यांत्रिकीकरणाचा फारसा प्रसार झालेला नाही. मात्र, कृषी विभागाने यंदा यांत्रिकीकरणावर अधिक भर दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भात काढणीसाठी पन्नास टक्के अनुदानावर रिपर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या रिपरचा अवलंब करून गव्हाची काढणी करू लागले आहे.
त्याबाबत मावळ तालुक्यातील कृषी व आत्मा विभागाने देवले येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करून रिपरच्या माध्यमातून गव्हाची काढणी करणे शक्य असल्याचे प्रात्यक्षिक दाखवले.