पुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील २८ गावे ७३ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासू लागण्याने पाणीपुरवठ्यासाठी २२ टॅंकर सुरू करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाई खूपच कमी असली तरी उन्हाचा ताप वाढत असल्याने पुढील काळात टंचाई वाढण्याची शक्यता आहे.
विभागात यंदा सातारा जिल्ह्याला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. साताऱ्यातील खटाव, माण, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील १९ गावे, ५८ वाड्यांना १५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. माण तालुक्यातील सर्वाधिक १० गावे आणि ४४ वाड्यांना पाणी देण्यासाठी ७ टॅंकर सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यातील भोर आणि पुरंदर तालुक्यातील ४ गावे १२ वाड्यांना चार टॅंकर तर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ५ गावे एका वाडीला तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप टंचाई भासलेली नाही.
विभागात गतवर्षी मे महिन्याच्या सुरवातीला २९० गावे आणि १८०० वाड्यांना २७१ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. सांगलीतील १४० गावे १००३ वाड्यांना १३९ टॅंकर, साताऱ्यातील १२३ गावे ५१७ वाड्यांना ९८ टॅंकर, तर पुणे जिल्ह्यातील २७ गावे २८० वाड्यांना ३४ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता, असे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. यंदा भूजल पातळी चांगली असून, धरणांमध्येही चांगला पाणीसाठा असल्याने टंचाईची तीव्रता कमी आहे.
विभागात पाणीपुरवठ्यासाठी सुरू असलेले टॅंकर :
सातारा : माण ७, खटाव ३, पाटण २, महाबळेश्वर १, कोरेगाव १, खंडाळा १. पुणे : भोर २, पुरंदर २.