नवी दिल्ली ः देशातील धरणांत ५९ टक्के पाणीसाठा झाला अाहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी अाहे. देशातील प्रमुख ९१ धरणांत गुरुवार (ता. १४) पर्यंत ९२.५१ अब्ज घनमीटर पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षी याच कालावधीत १०७.३७१ अब्ज घनमीटर पाणीसाठा होता.
विविध राज्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमधील सहा धरणांत ८६ टक्के पाणीसाठा झाला असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक अाहे.
पूर्वेकडील झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल अाणि त्रिपुरा अादी राज्यांतील १५ धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी म्हणजे ६२ टक्के पाणीसाठा झाला अाहे. पश्चिम भागातील गुजरात, महाराष्ट्रातील २७ धरणांत ७१ टक्के पाणीसाठा झाला अाहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश अाणि छत्तीसगडमधील १२ धरणांतही कमी म्हणजे केवळ ५९ टक्के पाणीसाठा झाला अाहे. तर दक्षिण विभागातील अांध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ अाणि तमिळनाडू येथील ३१ धरणांत ४१ टक्के पाणीसाठा झाला अाहे.