गंगापूर, दारणासह नऊ धरणांतून विसर्ग
नाशिक : नाशिक जिल्ह्यात रविवारी (ता. २२), सोमवारी (ता.२३) पावसाचा जोर काहीसा घटला. तरीही रिमझिम पावसामुळे धरणांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सद्यस्थितीत नऊ धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडला जात आहे. गंगापूर धरणाच्या विसर्गात ५९३१ क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दारणातून ३६५६ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. दरम्यान, पुढील ४८ तास जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
धरणांचे पाणलोट क्षेत्र वगळता जिल्ह्यात इतरत्र रविवारी पावसाचा जोर ओसरला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर २५, कश्यपीत २९, अंबोलीत २७ मिमी पावसाची नोंद झाली. पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचा विसर्ग ४३४२ वरून ५९३१ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ झाली असून, दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी पोचले आहे. परिणामी, गोदाघाटावरील जनजीवन काहीसे विस्कळित झाले आहे.
इगतपुरी तालुक्यात दिवसभरात १५ मिमी पावसाची नोंद झाली. दारणेतील आवक मंदावल्याने विसर्गात काहीशी घट करण्यात आली. नांदूरमध्यमेश्वरमधून १८,६७२ क्युसेक वेगाने पाणी मराठवाड्याकडे जात आहे. पालखेडमधून ६४६, भावलीतून ४८१, कडवातून १५५२, चणकापूरमधून २०६८, पुनदमधून २४२६ तसेच ठेंगोड्यातून ४५१८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
जिल्ह्यातील २४ प्रमुख धरणांमधील एकूण साठा ३२ हजार ४२९ दलघफूवर म्हणजेच ४९ टक्क्यांवर पोहचला आहे. मात्र, मालेगाव, नांदगाव, सिन्नरचा पूर्व पट्टा, चांदवड, निफाड तसेच येवला या भागांना आजही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भावली, वैतरणा ओव्हरफ्लो इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरण रविवारी (दि. २२) ओव्हरफ्लो झाले, तर भावली धरण १०० टक्के भरले. भावलीतून ४८१ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. वैतरणा ओव्हरफ्लो झाल्याने मुंबई शहर, उपनगरांची चिंता मिटली आहे. धरणसाठा (दलघफूमध्ये) : गंगापूर ४४२२, दारणा ५८७६, काश्यपी १३७२, गौतमी गोदावरी १११७, आळंदी ९२१, पालखेड ३३९, करंजवण ३२०६, वाघाड १४०७, ओझरखेड ५७४, पुणेगाव ३६६, तिसगाव १४, भावली १४३४, मुकणे २६६७, वालदेवी ८८३, कडवा १४९८, भोजापूर ९६, चणकापूर ११६८, हरणबारी ६८७, केळझर २०७, गिरणा ३५२१, पुनद ५५८३.