यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन वर्षांपासून सतत नुकसान होत असताना भरपाई मात्र मिळत नाही. वणी उपविभागातील ४५७२ शेतकऱ्यांमध्ये या कारणामुळे असंतोष निर्माण झाला असून या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
वणी उपविभागातील २६ हजार ८९० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यातील केवळ २२३१८ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. चार हजार ५७२ शेतकरी अद्यापही पीक विमा भरपाई पासून वंचित आहेत. शेतमालाचे किती टक्के नुकसान झाले याची चौकशी करण्यासाठी विमा कंपनीचे पर्यवेक्षक कार्यरत असतात. तथापि, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते फिरकतही नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. याउलट शेतकऱ्यांना त्यांच्याकडून त्रास अधिक होतो, असा आरोपही करण्यात आला आहे.
या विरोधात तीव्र आंदोलन छेडून ग्राहक मंचात दाद मागण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. वणी तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेच्या आठ मालेगाव व झरी तालुक्यात प्रत्येकी चार शाखा आहेत. वणी तालुक्यातील पीक विमा काढलेल्या दहा हजार ८४८ शेतकऱ्यांपैकी आठ हजार ५७२, मारेगाव तालुक्यातील ११ हजार १२० शेतकऱ्यांपैकी ९६२४, झरी तालुक्यातील ४९२२ शेतकऱ्यांपैकी ४१२२ शेतकऱ्यांना पीक विमा दावा प्राप्त झाला आहे. परिणामी पीक विमा भरपाई पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी स्वतः या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
कर्जमाफीत अन्याय महात्मा फुले कर्ज माफी योजनाअंतर्गत दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ मिळावा याकरिता वणी तालुक्यातील ६५७, मारेगाव तालुक्यातील ६७८, झरी तालुक्यातील ६२३ शेतकऱ्यांनी दोन लाखांपेक्षा अधिक असलेल्या कर्ज रकमेचा भरणा केला. परंतु या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला नाही. नवीन कर्जही त्यांना मिळाले नाही, याची दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंग गोहोकार दिला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.