औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील ४६ खरेदी केंद्रांवर १४ हजार ३४५ शेतकऱ्यांकडून उत्पादकतेच्या आधारे १ लाख ३७ हजार ७५१ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत यंदा हमीभावाने तूर खरेदीची सुरवात फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली. यात सर्वाधिक १४ खरेदी केंद्र बीड जिल्ह्यात सुरू असून सर्वात कमी पाच केंद्रे औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. त्यापाठोपाठ लातूर जिल्ह्यात दहा तर जालना जिल्ह्यात आठ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
तुरीच्या हमी दराने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी
लातूर जिल्ह्याने आघाडी घेतली होती. दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातही दहा हजारांवर तूर खरेदीसाठी नोंदणीचा आकडा गेला होता. औरंगाबाद जिल्ह्यात २४३८ तर जालना जिल्ह्यात ५७९३ शेतकऱ्यांनी हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती.
प्राप्त माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील ४३८० शेतकऱ्यांकडून ४३ हजार ०७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील २८५० शेतकऱ्यांकडून ३१ हजार, बीड जिल्ह्यातील ५३१९ शेतकऱ्यांकडून ४७ हजार ७९४, जालना जिल्ह्यातील १०५६ शेतकऱ्यांकडून ९३७३ तर औरंगाबाद जिल्ह्यातील ७४० शेतकऱ्यांकडून ६५७७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.
हरभरा खरेदीसंदर्भात आदेश आले असून उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारपासून (ता.७) हरभऱ्याची हमी दराने खरेदीसाठी नोंदणी केली जाणार असल्याची माहिती डीएमओ कार्यालयाकडून देण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील चार गोडावून पूर्ण क्षमतेने भरली असून उमरगा येथील एक गोडावून नव्याने भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे. कळंब तालुक्यातही एक गोडावून प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जालना जिल्ह्यात हरभऱ्याची उत्पादकता व जागा उपलब्धतेचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातही लवकरच हरभऱ्याची हमी दराने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.