कोरडवाहू फळपिकांच्या क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करा
कोरडवाहू फळपिकांच्या क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करा 
मुख्य बातम्या

कोरडवाहू फळपिकांच्या क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करा : डोंगरे

टीम अॅग्रोवन

नांदेड ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नासाठी फळपिकांचे विशेषतः सीताफळ, बोर, चिंच, जांभूळ आदी कोरडवाहू फळपिकांच्या तसेच हळदीच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. रेशीम शेतीवर लक्ष केंद्रित करावे. शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगाम २०१९ आढावा बैठक श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षेतेखाली झाली. या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड, पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. आर. बी. रत्नपारखी, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डाॅ. के. एस. बेग, डाॅ. के. टी. तेलंग, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक विजय उशीर, कार्यकारी अभियंता ए. व्ही. पत्तेवार, एन. पी. गव्हाणे आदी उपस्थित होते.

श्री. डोंगरे पुढे म्हणाले, ‘‘कापूस पिकांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रमाणात प्रचार आणि प्रसिद्धी मोहीम राबविण्यात यावी. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके योग्य दरात उपलब्ध होण्यासाठी गुण नियंत्रण पथके स्थापन करावित. शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काचा जास्तीत जास्त वापर करावा. जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार खतांच्या मात्रा द्याव्यात. त्यासाठी कृषी विभागातर्फे माहिती देण्यात यावी. कपाशीच्या एका विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. यंदाच्या वर्षात जिल्ह्यात फळबाग लागवडीवर भर देण्यात यावा. सीताफळ, बोर, चिंच, जांभूळ या कोरडवाहू फळपिकांच्या तसेच हळद पिकाच्या क्षेत्रात वाढ करावी. हळद आणि उसाचे संपूर्ण क्षेत्र ठिंबक सिंचनाखाली आणावे. रेशीम शेतीवर भर देण्यात यावा.’’ 

आत्मा अंतर्गत चारा पीक लागवडीचे काम चांगल्या प्रकारे झाल्याबद्दल श्री. डोंगरे यांनी समाधान व्यक्त केले. श्री. नादरे म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामासाठी बियाणे, खते वेळेवर आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. खरिपासाठी एकूण २ लाख ७७ हजार ६६० टन खतसाठा उपलब्ध होणार आहे. 

श्री. चलवदे म्हणाले, ‘‘या वर्षी जिल्ह्यात कापूस, तूर, सोयाबीन, हळद आदी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांच्या शेतावर माहिती देण्यासाठी ४०० शेतीशाळा घेण्यात येणार आहेत.’’ या वेळी श्री. देशमुख यांनी गुलाबी बोंड अळी निर्मूलन कार्यवाही, नियोजन याबाबत सादरीकरण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT