सातारा ः जिल्ह्यात काही भागांत उन्हाळी पीक पेरण्यांना प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र ७४३६ हेक्टर असून, यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर उन्हाळी पिकांच्या पेरण्या होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यास सुरवात केली आहे.
जिल्ह्यात उन्हाळी हंगामात उन्हाळी भूईमूग व मका ही पिके घेतली जातात. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा या दृष्टीने मका पिकावर भर दिला जात आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मका पिकांची लागवड झाली आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली आहेत.
यामुळे या दुष्काळी तालुक्यांतही उन्हाळी पेरण्या होणार आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या दृष्टीने यंदा मक्याची जास्त पेरणी होण्याचा अंदाज आहे. खरीप हंगामात नगदी पिकांमुळे भुईमूग पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. परिणामी ज्या भागात पाण्याची उपलब्धतता आहे, अशा भागात उन्हाळी पेरण्या होणार आहेत.
सातारा, कऱ्हाड, वाई, जावली, पाटण या तालुक्यात उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीस प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात भुईमुगाचे ५२८०, तर मक्याचे २१५६ असे एकूण सात हजार ४३६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. जानेवारी महिन्याच्या सुरवातीपासून भुईमुगाच्या पेरणीस सुरवात झाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात उसात आंतरपीक म्हणूनही भुईमुगाची लागवड करण्याचा कल वाढला आहे.
जून महिन्यात ओल्या भुईमूग शेंगेस दर चांगला मिळतो, या दृष्टीने मार्च महिन्यातही भुईमूग पिकाची लागवड केली जाते.