जळगाव ः खानदेशात सुमारे १६ लाख टन ऊस गाळप झाले आहे. सर्वाधिक गाळप पुरूषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने केले आहे. या पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील खासगी कारखान्याने गाळप पूर्ण केले आहे.
खानदेशात ऊसगाळप आणखी महिनाभर सुरू राहील. सुरुवातीला सुरू झालेले सर्व साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. शिवाय नगर, औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील कारखानेदेखील उसाची खरेदी किंवा तोडणी जळगाव, धुळ्यात करून घेत आहेत. धुळ्यातील साक्री, धुळे भागात नाशिक जिल्ह्यातील कारखाने खरेदी करीत आहेत. जळगावमध्ये औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील कारखाने उसाची तोडणी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे एक, धुळ्यात शिरपुरात एक लहान कारखाना तर नंदुरबारात चार साखर कारखाने सुरू आहेत.
जळगाव जिल्ह्यातील ऊस तोडणी अंतिम स्थितीत आहेत. मध्यंतरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे गाळपावर परिणाम झाला होता. तर नंदुरबार व धुळ्यातील काही भागात गेल्या महिन्यात पाऊस झाल्याने गाळप व तोडणी थांबवावी लागली होती. तोडणी आणखी महिनाभर सुरू राहील.
जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा भागात नगर, नाशिक जिल्ह्यातील कारखाने ऊस तोडणी करीत आहेत. उसाची टंचाई कुठे जाणवलेली नाही. सातपुडा सहकारी साखर कारखान्याला मध्य प्रदेशातूनही ऊस उपलब्ध झाला आहे.
‘मधुकर’, ‘चोपडा’ बंद
जळगाव जिल्ह्यात न्हावी (ता.यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना व चहार्डी (ता.चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखाना बंद आहेत. यामुळे बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांनी या भागात ऊस तोडणी केली आहे. तोडणी मार्चअखेर बंद होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.