जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठा गाजावाजा करून सुरू झालेली धान्य लिलाव प्रक्रिया जवळपास ठप्प झाली आहे. बाजार समितीत सोयाबीनचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत, परंतु सौदे होत नसल्याने शेतकऱ्यांचा सोयाबीन बाजार समितीमध्ये पडून राहत असल्याची माहिती आहे.
ऑक्टोबर महिन्यात बाजार समितीत आवक झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा जाहीर लिलाव सुरू झाला. लिलाव नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत बऱ्यापैकी सुरू होते. परंतु अलीकडे लिलावांना प्रतिसाद कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरीही लिलावात फारसे धान्य आणत नाहीत.
काही अडतदारांनी मिळून लिलाव प्रक्रियेत खरेदी न करण्याचा प्रकार केला व नंतर लिलावांना प्रतिसादच कमी झाल्याची कुरबूर बाजार समितीमध्ये आहे. सध्या सोयाबीनचीच अधिक विक्री होत आहे. परंतु लिलावात मोजकाच सोयाबीन काही व्यापारी खरेदी करीत आहेत. अशात सोयाबीनचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊनही सौदे होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
असाच प्रकार सुरू राहिला तर लिलाव प्रक्रिया पुढील महिनाभरात ठप्प होईल व पूर्वीप्रमाणे अडतदारांकडे थेट धान्य पोचविण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहणार नाही, असे शेतकरी संघटनेचे अजय बसेर म्हणाले.
बाजार समितीत मागील महिन्यातच नवे सभापती म्हणून लक्ष्मण पाटील यांच्याकडे सूत्रे आली आहेत. आता लिलाव पद्धतीत लक्ष घालायचे तर अडतदार नाराज होतील आणि लिलाव प्रक्रिया ठप्प झाली तर शेतकऱ्यांचा शेतीमाल वेळेत विक्री न होणे, अडतदारांकडे अडवणूक असे प्रकार होतील. अशातच बाजार समितीत व्यापारी संघटनेचा प्रभाव असल्याने थेट वरिष्ठ नेत्यांकडे याची तक्रार जाईल म्हणून या प्रकरणात सभापती पाटील यांचेही हात बांधले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन लिलाव प्रक्रियेत कमी दरात मागितला जातो. त्यामुळे तो चांगले दर मिळतील तेव्हा विकू म्हणून शेतकरी सोयाबीन घरी परत नेण्याऐवजी अडतदारांकडेच ठेवतात. असा अनेक शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन अडतदारांकडे ठेवला आहे. त्याचे सौदे होत नसून प्रचलित दरांपेक्षा कमी दर देण्याचा प्रकार बाजार समितीत सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.