अकोला ः जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यामध्ये टाटा ट्रस्ट राज्य शासनासोबत काम करणार असून, याअंतर्गत सुमारे ४० कोटी रुपये खर्चून कामे केली जाणार आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, टाटा ट्रस्टचे विभागीय प्रमुख मुकुल गुप्ते व विदर्भ प्रमुख राहुल दाभने यांच्या उपस्थितीत नुकताच याबाबत संयुक्त सामंजस्य करार झाला अाहे. तीन वर्षात अकोला जिल्ह्यात १२ कोटी ७८ लाख रुपयांची कामे केली जाणार असल्याची माहिती गुरुवारी (ता. २१) जिल्हाधिकारी अास्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. यावेळी मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी भगवान सैंदाने, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, टाटा ट्रस्टचे जिल्हा व्यवस्थापक अाशिष मुडावदकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, की जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत अकोला जिल्ह्यात ३० किलोमीटर लांबीचे नाले खोलीकरण व नदीचे पुनरुज्जीवन केले जाईल. त्यात बंधारेही बांधले जातील. या कामांसाठी शासनाचा वाटा ५५, टाटा ट्रस्टचा वाटा ४० टक्के अाणि पाच टक्के लोकसहभाग राहील. या अभियानातून जिल्ह्यात ६७५० एकर जमीन संरक्षित अोलिताखाली येईल. यासाठी १२ कोटी ७८ लाख खर्च अपेक्षित अाहे. यात टाटा ट्रस्ट सात कोटी ३ लाख ४२ हजार रुपये वाटा देणार अाहे. दरवर्षी १० किलोमीटर काम केले जाणार असून यासाठी मूर्तिजापूर व पातूर तालुक्याची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात अाली. कमळगंगा अाणि निर्गुणा नदीचे काम केले जाईल.
यावेळी टाटा ट्रस्टचे मार्केटिंग मॅनेजर रोशन अढाऊ, डेअरी व्यवस्थापक डॉ. महेश बेंद्रे, मृद व जलसंधारण तज्ज्ञ सुधीर नाहते, विजय राठी, शंकर अमलकंठीवार, अंबादास चाळगे व सहायक राणी गुडधे उपस्थित होते.
अाशिष मुडावदकर यांनी सांगितले, की या कराराअंतर्गत अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातही २०१८ ते २०२१ या तीन वर्षात काम केले जाईल. यात यवतमाळमध्ये ५०, अकोल्यात ३० अाणि अमरावतीमध्ये २० किलोमीटरची कामे केली जात अाहे. यासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च केला जाणार असून २२ हजार ५०० हेक्टर सिंचन क्षमता तयार केली जाईल.