सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी (ता. १२) पुन्हा हजेरी लावली. पहाटेपासून दुपारपर्यंत त्याची रिमझिम सुरू होती; पण त्यात अधिक जोर नव्हता. त्यानंतरही दिवसभर कधी ढगाळ, कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण होते.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नुसतेच ढगाळ वातावरण राहते. पण पाऊस काही पडत नाही. गुरुवारीही पहाटेपासूनच वातावरणात एकदम बदल झाला आहे. आभाळ ढगांनी दाठून गेले होते. सकाळी सहाच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत थांबून-थांबून पावसाची रिमझिम सुरू होती. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर भागात असे वातावरण कायम होते.
पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीदेखील अजूनही जिल्ह्यात पावसाचा जोर नाही. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या हलक्या पावसावर खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. आता उगवलेल्या पिकांना पावसाची गरज आहे. मात्र पाऊस लांबत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा आतापर्यंत ५४ हजार हेक्टरवर (६०) पेरण्या झाल्या आहेत.
उजनी धरणाच्या पातळीत वाढ पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पाऊस झाल्याने सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणाच्या साठ्यात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. दौंडकडून उजनी धरणात ४२८२ क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. १२) धरणाची पाणीपातळी ४८९.९५० मीटरपर्यंत होती. गेल्या काही दिवसांतील पातळीचा विचार करता जवळपास दोन ते अडीच टक्क्यांनी पाणीपातळीत वाढ झाली आहे.