The rain is pouring down again
The rain is pouring down again 
मुख्य बातम्या

वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळ

टीम अॅग्रोवन

अकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या तीनही जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) पावसाने बऱ्याच ठिकाणी जोरदार हजेरी लावली. अकोला  जिल्हयात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यांमध्ये दुपारी धुमाकूळ घातला. दुपारी सुरू झालेला पाऊस सायंकाळपर्यंत सुरू होता. याचा फटका संग्रामपूर, तेल्हारा, अकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये बसला. मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. वाशीम जिल्ह्यातही सार्वत्रिक स्वरुपात पाऊस झाला.

या भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. मागील तीन दिवसांत पावसाने अधिक जोर पकडला. अकोट, तेल्हारा, संग्रामपूर या तालुक्यात अनेक गावातील पिके जलमय झाली. नदी-नाले जोराने वाहते झाले. अकोट तालुक्यात सरासरी १० मिलिमीटर, तर तेल्हारा तालुक्यात १२.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संग्रामपूर तालुक्यात १०.५, जळगाव जामोद तालुक्यात १९ तर मोताळा तालुक्यात १४.८ पाऊस झाला.

वाशीम जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यात ५५.५ मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली. याशिवाय कारंजामध्ये २३.९, वाशीम १७.३, मानोरा १७.१ अशी नोंद झाली. अकोट तालुक्यात शिवापूर परिसरात मंगळवारी (ता. २२) दुपारी १ वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत हा पाऊस कोसळत होता. या पावसाने शिवापूर, बोर्डी, उमरा, शहापूर, गीतापूर, मकरमपूर, राहणापूर, रामापूर आदींसह दहा गावांतील केळी, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे नुकसान केले. गेल्या पंधरा दिवसांपासून सततच्या पावसामुळे पीक काढणीच्या वेळेस हा अति पाऊस होत असल्याने चिंता वाढली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाचं सावट निर्माण झालेल्या परिसरात आता अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाले. अकोलखेड आणि पणज, उमरा या महसूल मंडळांत अन्य भागात अतिवृष्टी झाली.

नुकसान भरपाईची मागणी यंदा मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी खरिपाची लागवड केली. आता पीक काढण्याची वेळ आली असताना मुसळधार पावसामुळे होत्याचे नव्हते झाले आहे. कापसाचे बोंड कुजत असून गळती लागली. सोयाबीन पिकाचेही बेहाल आहेत. उडीद, मूग तर पुर्णपणे खराब झाले. परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असून आता कुठलेही निकष न लावता सर्वांना नुकसान भरपाई त्वरीत देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २२) अकोट तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली. यावेळी काँग्रेस कमेटी ग्रामीणचे अध्यक्ष प्रशांत पाटिल पाचडे, काँग्रेसचे शेतकरी नेते राजेश भालतिलक, सचिन अंबळकार, गोकुळ लटकुटे, हरी वनकर, दिनेश देशमुख, कपील रजाने, दीपक अंबळकार, अनिल धर्मे, पुंडलिक बोरोकार, अंकुश बेगडे, गणेश खांदेल, तुळशीदास वाघमारे आदी शेतकरी उपस्थित होते.

संग्रामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.२२) धो-धो पाऊस पडला. या पावसाने शेतामधील सोयाबीन, कपाशी, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. कवठळ, संग्रामपूर, पातुर्डा व बावनबीर महसूल मंडळातील बहुतांश गावात जोरदार पाऊस पडला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, मूग, उडीद आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अगोदर मूग, उडीद पिके हातातून गेली व आता या पावसाने काही दिवसातच काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान केले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT