अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना जोरदार तडाखा
अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना जोरदार तडाखा 
मुख्य बातम्या

वऱ्हाडात अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना जोरदार तडाखा

टीम अॅग्रोवन

अकोला  ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यांत काही भागांत रविवारी (ता. १) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात पातूर, बाळापूर, अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत शेगाव, जळगाव जामोद, खामगाव; वाशीम जिल्ह्यात मालेगाव, मंगरुळपीर, वाशीम तालुक्यांत ही आपत्ती कोसळली. शेकडो हेक्टरवरील गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले असून, विविध फळपिके, भाजीपाला, काढणीला आलेल्या हरभरा पिकाचे नुकसान झाले. यंत्रणांनी तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून या भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. रविवारी दुपारपासून काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसासोबतच हरभऱ्याच्या आकाराच्या गाराही पडल्या. या पावसाचे क्षेत्र वाढत जाऊन पुढे हा पाऊस थेट वाशीम व इकडे बुलडाणा जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्यापर्यंत पोचला. रात्री उशिरापर्यंत बऱ्याच गावांमध्ये पावसाने हजेरी दिली. नुकसानाचे क्षेत्र प्रामुख्याने पातूर, खामगाव तालुक्यांत सर्वाधिक असल्याचे समोर येत आहे.  अकोला जिल्ह्यातील बाभूळगाव सर्कलमध्ये सर्वाधिक ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या वर्षी खरिपात परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद या पिकांचे नुकसान केले होते. आता रब्बीतही हाच प्रकार घडत असून, अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, फळबागांचे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना झेलावे लागत आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करा ः आमदार सावरकर जिल्ह्यातील अकोला, पातूर, बाळापूर तालुक्यांसह इतर काही ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे गहू, संत्रा, आंबा, कांदा, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात आमदार सावरकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासोबत संपर्क साधून त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला आधार देण्याची मागणी केली आहे. 

नुकसानभरपाई द्यावी ः राजेंद्र पातोडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची तातडीने पाहणी व पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीमुळे हिरावला गेला आहे. या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. युद्धपातळीवर नुकसानीची पाहणी करून त्याबाबत मदतीचा अहवाल तातडीने शासनाला पाठविण्यात यावा. सरकारनेदेखील विनाविलंब ही नुकसानभरपाई सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्याची मागणी वंचितचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. क्षणार्धात उद्ध्वस्त झाले ! आमच्या भागात रविवारी सायंकाळी अचानक जोरदार वादळी पाऊस झाला. यामध्ये ओंब्या परिपक्व झालेल्या शेकडो हेक्टरमधील गव्हाचे व लिंबू बागांचे अतोनात नुकसान झाले. आमचा सहा एकरातील गहू जमिनीवर लोळला आहे. कारले, दोडक्याचे वेल जमिनीवर आले. या आपत्तीत प्रचंड नुकसान झाले आहे. — किरण धोत्रे, शेतकरी, विवरा, ता. पातूर, जि. अकोला

सर्वेक्षणाचे आदेश दिले रविवारी (ता. १) वादळी वारा, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात जे नुकसान झाले त्याचे सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. कृषी विभागाची यंत्रणा नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन पाहणी करेल. त्यानंतर अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाईल. ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या गहू, हरभरा या पिकांचा विमा काढला असेल त्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना तातडीने सूचना द्यावी. त्याचा एक अर्ज कृषी विभागाकडे द्यावा. याबाबत कंपनीकडून तातडीने पंचनामे करण्याबाबत सूचना केली जाईल. — मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT