नांदेड : ‘‘मराठवाड्यात बहुतांश शेतकरी तूर, मूग, उडीद, सोयाबीन इत्यादी पिके घेतात. खळे झाल्यानंतर काड शिल्लक राहते. हा भुसा शेतकरी शेतामध्येच कुजवतात, जाळून टाकतात. परंतु यावर प्रक्रिया करून दर्जेदार पशुखाद्य बनवू शकतो. ह्याचे प्रात्यक्षिक सगरोळी (ता. बिलोली) येथे कृषी तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आले.
पीक काढणीनंतर शिल्लक राहिलेला भुसा निकृष्ट दर्जाचा असल्याने जनावरांना फारसा आवडत नाही. परंतु अशा निकृष्ट चाऱ्यावर युरिया आणि गूळ वापरून चारा प्रक्रिया केल्यास त्या निकृष्ट चाऱ्याचे रूपांतर पौष्टिक चाऱ्यात होते. गूळ, मीठ, युरिया आणि खनिज मिश्रण यांचे द्रावण चाऱ्यावर शिंपडून २१ दिवस बंद पिशवीत ठेवल्यास दर्जेदार चारा बनतो. दुसऱ्या प्रकारात हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून पाणी, गूळ, मीठ व खनिज मिश्रणाचे द्रावण शिंपडून हवाबंद पिशवीमध्ये ४५ ते ६० दिवस ठेवल्यानंतर मूरघास तयार होते. ही प्रक्रिया करून वर्षभर जनावरांना पौष्टिक खाद्य देऊ शकतो.
मुरघास निर्मिती दरम्यान हवा विरहित स्तिथीमध्ये अंबावण्याची प्रक्रिया होते. यामध्ये प्रथिने, कॅरोटीन आणि इतर आम्ल तयार होतात. यामुळे याला आंबट गोड वास असतो. एका बंद पिशवीतील खाद्य एका जनावरासाठी जवळपास दोन महिने पुरेल. ह्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा चाऱ्यावरील खर्च कमी होऊन जनावरांना दर्जेदार खाद्य मिळते. यावेळी शेतकऱ्यांनी स्वतः सर्व वस्तू हाताळून पाहिल्या व स्वतःच्या शेतातील भुसा, काढ, वापरण्याचे निश्चित केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ डॉ. निहाल मुल्ला, पशुधन पर्यवेक्षक भास्कर बुच्छलवार, राजू गिरगावकर यांनी या प्रक्रियेची माहिती दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.