`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`
पुणे : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव शेतीमालाला देऊ ही अाश्वासने सरकार पाळत नाही. शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी घोड्यावरून केली जाते, कधी रात्री पाहणी केली जाते. शेतकऱ्यांच्या गळ्यात आरोपीसारख्या पाट्या घातल्या जातात. सरकारने अक्षरश: पोरखेळ चालविला आहे. या शेतकऱ्यांच्या जोरावर तुम्ही राज्यकर्ते झाला. त्या शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला केला.
जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या डाॅ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार, अादर्श गोपालक पुरस्कार, शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कारांचे वितरण शनिवारी (ता. २३) श्री. पवार यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य या वेळी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, की उत्पादन खर्चाच्या दीडपट शेतीमालाला भाव देण्याचे अाश्वासन दिले; मात्र सरकारमध्ये गेल्यावर भाव देता येत नाही. साखर, भाजीपाल्याला भाव नाही. शेतकऱ्यांच्या दुधाला १९ ते २० रुपये लिटर आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला दहा रुपयांचा अधिकचा भाव दिला पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर चार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाही. खतांच्या किमती, वीजदर, पाणीपट्टी वाढवता. मग शेतीमालाचे दर का वाढवत नाही. सरकारची धोरणेच चुकीची आहेत, अशी टीका श्री. पवार यांनी केली.
शहराला पाणी दिले पाहिजेच, त्याचबरोबरच खडकवासला प्रकल्पातून हवेली, दौंड, इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. मुळशी धरणाचे पाणी टाटाची वीज तयार करण्यासाठी जाते. वीजनिर्मितीचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने मुळशीचे पाच टीएमसी पाणी पुण्याला द्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. मुळशीचे पाणी पुण्याला मिळाले, तर खडकवासलामधून शेतकऱ्यांना अधिकचे पाणी देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार जूनपर्यंत सरसकट कर्जमाफी देणार, अशी घोषणा केली जाते, तर अधिकारी त्याला विरोध करतात. आता अधिकारीच डोईजड झाले आहेत. आमच्या काळात अधिकाऱ्यांची असे सांगायची ताकद नव्हती. अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची धमक दुर्देवाने अलीकडच्या नेतृत्वात दिसत नाही. विजेच्या जोडण्या तोडण्यास सुरवात केली आहे. त्यावर सरकारने वीज तोडणार नसल्याचे सांगितले. आता अधिकारी काय करतात ते कळेल, असेही त्यांनी सांगितले.