निरगुडसर, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरसह जवळे, भराडी परिसरात सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकतेच लागवड केलेले बटाटा पीक सडण्याच्या मार्गावर आहे. साधारण २०० एकरांहून अधिक क्षेत्रावरील बटाटा शेतीला पावसाचा फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये उसासह बटाटा पिकाचा समावेश आहे. गेल्या आठ दिवसांत निरगुडसर परिसरातील शेतकऱ्यांनी २०० हून अधिक एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केली आहे. त्याकरिता बियाणे, खते, मजुरी यासाठी एकरी २० ते ३० हजार रुपये खर्च केला आहे.
परंतु, गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे लागवड केलेल्या बटाटा शेतीच्या सऱ्या पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. सततच्या पावसामुळे बटाटा बियाणे सडू लागले आहे.
निरगुडसर येथील शेतकरी गणपत महादू ढोबळे यांनी मागील महिन्यात २२५ कट्ट्याची १४ एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केली होती. परंतु, मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे बियाणे सडले व त्यातून तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर त्याच शेतकऱ्याने पुन्हा आठ दिवसांपूर्वी दहा एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केली. परंतु, पुन्हा सलग चार दिवस पावसाने हजेरी लावल्याने बियाण्यांची पुन्हा सड होऊन त्यांचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे निरगुडसर परिसरासह भराडी, जवळे परिसरातील शेतकऱ्यांचे बटाटा बियाणे सडू लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गणपत ढोबळे यांनी ५ ते १० सप्टेंबर दरम्यान १४ एकरांवर बटाटा बियाण्यांची लागवड केली. त्यानंतर पावसामुळे बटाटा बियाणे सडले. त्यानंतर त्यांनी या महिन्यात आठ दिवसांपूर्वी १० एकरांवर बटाटा लागवड केली. परंतु पावसामुळे पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागले. यामध्ये या शेतकऱ्याचे एका महिन्यात एकूण पाच लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. पण हार मानायची नाही हे धोरण ठेऊन पाऊस उघडल्यावर पुन्हा १० एकरांवर बटाट्याची लागवड करणार असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.