pomegranate
pomegranate  
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब मातीमोल

टीम अॅग्रोवन

नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला आलेल्या फळांवर तेलकट काळे डाग पडल्याने मोठे नुकसान होत आहे. नेमके किती नुकसान झाले याचा आकडा जिल्हा कृषी विभागाकडे नाही. मात्र, जाणकारांच्या मते, सुमारे आठ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील फळांचे ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दरवर्षी डाळिंबाला प्रती किलोला साधारण ७० ते ८० रुपयाचा मिळणारा दर पंधरा ते वीस रुपयांवर आला आहे. यंदा जिल्हाभरातील डाळिंब उत्पादकांना सुमारे सहाशे ते सातशे कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.  नगर जिल्ह्यात राहुरी, राहाता, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, संगमनेर, नगर तालुक्यांत डाळिंबाच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. साधारण वीस हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर जिल्ह्यात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. त्यात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रावर आंबिया बहार घेतला जातो. हीच फळे सध्या विक्रीला आलेली आहेत. मात्र जिल्हाभरात डाळिंबावर तेलकट डाग, करपा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने ८० टक्के बागांमधील फळे काळी पडली आहेत.  साधारण ५० टक्के डाळिंब फळांची जागेवर फळगळ झालेली असल्याने ती फेकून दिल्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय उरला नाही. त्यातही जी फळे विक्रीला नेली जात आहेत, त्यालाही गेल्या वर्षीच्या तुलनेत चाळीस रुपये प्रती किलोला कमी मिळत आहेत. त्यामुळे यंदा डाळिंबाचे उत्पादनही तोट्यातच आहे.  ‘‘आमच्याकडे सात एकरावर डाळिंब आहेत. रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्के नुकसान झाले आहे,’’ असे एरंडगाव (ता. शेवगाव) येथील डाळिंब उत्पादक शेतकरी संदीप भागवत यांनी सांगितले. जिल्हाभरात सुमारे सहाशे ते सातशे कोटी रुपयांचा फटका बसला असून हे मोठे नुकसान असल्याने डाळिंब उत्पादक हतबल झाले आहेत.  कृषी विभागाकडे ना माहिती, ना आकडेवारी सर्वच भागात डाळिंबावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्यावर उपाययोजना सुचवल्या आहेत. मात्र कृषी विभागाला अजूनही डाळिंबाच्या नुकसानीचे गांभीर्य नाही. नेमके बाधित क्षेत्र किती याचा साधा आकडाही कृषी विभागाकडे नाही. कृषीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ना मार्गदर्शन केले ना सल्ला दिला. प्रतिक्रिया डाळिंबावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या डाळिंबाचे पंचनामे करुन शासनाने डाळिंब उत्पादकांना आर्थिक मदत जाहीर करावी, याबाबत शासनाकडे मागणी करणार आहे.  - संभाजी दहातोंडे पाटील, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी मराठा महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT