येवला, जि. नाशिक : अवर्षण प्रवण असलेल्या येवला तालुक्यात मागील दहा-पंधरा वर्षांपासून हक्काचे पीक म्हणून कपाशीचा पर्याय शेतकऱ्यांना मिळाला आहे. यंदा मात्र एक तर भाव समाधानकारक नसून त्यातच कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ बसली आहे. तालुक्यात तब्बल १३ हजार हेक्टरवरील कपाशीचे क्षेत्र बोंड अळीमुळे बाधित झाल्याने या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. पंचनामे सुरू असले तरी मदत किती मिळणार हे अद्याप गुलदस्तात आहे.
मागील वर्षी कपाशीला क्विंटलला सहा हजारांचा भाव मिळाल्याने या वर्षी कोरडवाहू तसेच बागायतदार शेतकऱ्यांनीदेखील कपाशीची लागवड केली; मात्र बाजारपेठेतील धोरणांचा फटका बसून ४५०० ते ४८०० रुपयांपर्यत भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात आहेत. त्यातच कपाशी जोमाने आली असताना सरतेशेवटी जोमदार पिकावर बोंड अळीने हल्ला करून कपाशीचे प्रचंड नुकसान केले. त्यामुळे तब्बल पंधरा हजारांवर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या पिकाच्या नुकसानभरपाईसाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले होते. तालुक्यातील दोन हजार शेतकऱ्यांनी या नुकसानीबाबत अर्ज भरून दिले असून, कृषी विभागाने गावोगावी शेतातील उभ्या कपाशीचे पंचनामे सुरू केले आहे. तलाठी या पथकाचे अध्यक्ष, ग्रामसेवक सचिव तर कृषी सहायक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहत असून, वेगाने पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीची भरपाई काय व किती मिळणार हे मात्र अद्यापही गुलदस्ताच आहे.
पाणीटंचाईमुळे तालुक्यातील शेतकरी कपाशीकडे हक्काचे पीक म्हणून पाहत आहेत. यामुळे कांद्याच्या या आगारात कांद्यानंतर सर्वाधिक क्षेत्रावर कपाशीचे पीक घेतले जात आहे. यंदा मात्र मोठ्या क्षेत्रावरील कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या अळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यात कपाशीचे उभे फड उद्ध्वस्त झाले आहे.