पीकविमा सुरक्षेचे कवच ठरले कुचकामी
येवला : अवकाळी पाऊस, गारपीट, अवर्षण, दुष्काळ या संकटकाळात पीकविमा नक्कीच आधारवड मानला जातो; पण विम्याचे हे कवच केवळ गाजर असून, कंपन्या मालामाल करणारे असल्याने शेतकरी याकडे काणाडोळा करत आहेत. तालुक्यात तर यंदा अद्याप एकानेही पिकाचा विमा उतरवलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. खरिपात पीककर्ज न मिळाल्यानेदेखील आकडे घटले आहेत, हेही कारण यामागे आहे.
खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळे, कापूस, कांदा इत्यादी पीक उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक तर कर्जदारांना सक्तीचा आहे. पण विमा भरला, पिकांचे नुकसान झाले, मात्र हाती एक कवडीही आली नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे.
वर्षानुवर्षे भरलेले पैसे वाया जात असल्याचा अनुभव असल्याने शेतकरी आता याकडे उघडपणे काणाडोळा करत आहेत. तालुक्यात विम्याचा लाभ घेऊ शकणारे सभासद सुमारे २४ हजार आहेत. जिल्हा बँकां अडचणीत अडकल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्ज मिळालेले नाही. याचा पीकविमा योजनेला मोठा फटका बसला आहे. मुळात पीककर्ज घेताना कर्जातूनच विम्याची रक्कम कपात केली जाते; पण कर्जच नाही म्हणून विमा नसल्याचे चित्र आहे. खरीप पिकांचे संरक्षणाचे कवच कवडीमोल ठरत आहे. जिल्ह्यातूनच होतोय काणाडोळा २०१६ मध्ये जिल्ह्यातील ८९ हजार ३३६ शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला होता. त्यापैकी १ हजार ६४१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. तर २०१७ मध्ये जिल्ह्यात ७ लाख ९७ हजार ६९७ खातेदार शेतकरी असून, यापैकी केवळ ४ हजार ६४२ शेतकऱ्यांनीच पीकविम्याचा लाभ घेतला आहे. म्हणजेच ७ लाख ९३ हजार शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली होती. यंदाचे आकडे तर अधिकच गंभीर राहणार, असेच चित्र आहे.