परभणी : जिल्ह्यातील पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल कॅलॅमिटीज) अंतर्गत नुकसाभरपाईसाठी विमा कंपनीकडे चार पद्धतीने एकूण ३ लाख ११ हजार ७७३ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. गुरुवारी (ता. २१) एकूण १ लाख ८२ हजार २९५ शेतकऱ्यांच्या पीकनुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. अजून १ लाख २९ हजार ४७८ शेतकऱ्यांचे पंचनामे प्रलंबित आहेत. तत्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी विमाधारक शेतकऱ्यांनी केली आहे. पीकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या पूर्वसूचना टोल फ्री नंबरद्वारे विमा कंपनीचे कॉल सेंटर, ई-मेल, राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर (एनसीआयपी) ऑनलाइन पद्धतीने तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे ऑफलाइन नोंदवीता येतात. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात खरीप पिके विविध अवस्थेत असताना अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. नद्या, नाल्यांच्या पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. काढणीच्या अवस्थेतील उभे सोयाबीन, वेचणीच्या अवस्थेतील कपाशी, उभी तूर आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीच्या पूर्वसूचना दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार विमा कंपनीकडे टोल फ्री नंबरवरून कॉल सेंटरकडे ३६ हजार ६८० पूर्वसूचना, ई-मेलद्वारे ६ हजार ३७ पूर्वसूचना, राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर १ लाख ७६ हजार ७५९ पूर्वसूचना, तर शेतकऱ्यांनी स्वतः (ऑफलाइन) विमा कंपनी प्रतिनिधींकडे ९२ हजार २९७ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.