भात पिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव
पुणे ः गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेला हवामानातील बदल, वाढते तापमान, कमी अधिक प्रमाणात होणारा पाऊस आदी कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील भात पट्ट्यात करपा व तुडतुड्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यामुळे भात उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीच्या भरपाईपासून सुमारे १३ हजार ३३१ शेतकरी वंचित असून, ही नुकसानभरपाई केव्हा मिळणार, असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या वर्षी मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांत ५८ हजार ६७० हेक्टरवर भात लागवड झाली होती. भातपीक वाढीच्या अवस्थेत असताना त्यावर करपा व तुडतुड्यांचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर तज्ज्ञांनी पिकाची पाहणी करून चिंता व्यक्त केली होती. शेतकऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना कृषी विभागामार्फत देण्यात आल्या होत्या. मात्र, झालेला प्रादुर्भाव आटोक्यात न आल्याने मोठे नुकसान झाले होते.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविला होता. परंतु अद्याप या नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही.
या अहवालात आंबेगाव, भोर, मुळशी, हवेली आणि खेड तालुक्यांतील ६८ हजार ४१३ शेतकऱ्यांनी २६ हजार ९७१ हेक्टरवर भात लागवड केली. त्यापैकी १३ हजार ३३१ शेतकऱ्यांचे ४९२९. ४० हेक्टर क्षेत्र (३३ टक्क्यांपेक्षा अधिक) बाधित झाले आहे. त्यासाठी जिरायती क्षेत्राप्रमाणे हेक्टरी सहा हजार ८०० रुपयेप्रमाणे तीन कोटी २२ लाख ९१ हजार ४३२ रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.