सेंद्रिय ऊसगाळपाने दत्त कारखान्यातर्फे हंगामाचा प्रारंभ
सेंद्रिय ऊसगाळपाने दत्त कारखान्यातर्फे हंगामाचा प्रारंभ  
मुख्य बातम्या

सेंद्रिय ऊसगाळपाने दत्त कारखान्यातर्फे हंगामाचा प्रारंभ

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : शिरोळच्या दत्त साखर कारखान्याने यंदा गळीत हंगामाचा प्रारंभ सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उसाने केला आहे. या उसाची तोडणी रविवार (ता. ११) पासून सुरू करण्यात आली. पश्‍चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच या कारखान्याने हंगामाचा प्रारंभ सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उसाच्या गाळपापासून केला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ३०० एकर उसाची तोड येत्या आठवडाभरात करण्यात येणार आहे. यातूनच सेंद्रिय साखरेची निर्मिती करण्यात येईल. या साखरेस नियमित साखरेपेक्षा जादा भाव मिळण्याची शक्‍यता आहे. ही साखर घेण्यासाठी काही व्यापाऱ्यांनीही तयारी दर्शविली आहे.

नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादन वाढविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणाऱ्या कारखान्यामध्ये दत्त साखर कारखान्याचे नाव घेतले जाते. एकरी दीडशे टन हा दिशादर्शक उपक्रम त्यांनी काही वर्षांपासून सुरू केला. यातून हजारो शेतकरी शंभर टन अथवा त्याहून अधिक उत्पादन घेत आहेत. यातूनच कारखान्याने दोन वर्षांपूर्वी सेंद्रिय शेतीबाबत लक्ष देणे सुरू केले. गेल्या वर्षी पाच प्लॉट घेऊन या उसाचे उत्पादन घेता येते का, याची चाचपणी केली. यानंतर गेल्या वर्षीच्या लागवडीपासूनच सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी प्रयत्न केले.

सेंद्रिय निविष्ठांचे वाटप सेंद्रिय शेती करणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन या पद्धतीने शेती करण्यास प्रारंभ झाला. कारखान्याच्या वतीने गांडूळ खत, कोंबडी खताचे वाटप करण्यात आले. याचबरोबर घनामृत, दशपर्णी अर्क, देशी गायीच्या शेणाच्या स्लरी याची माहिती देऊन या घटकांचा प्रत्यक्षात वापर शेतकऱ्यांकडून करून घेतला. शेती विभागाच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांत उत्साह निर्माण झाला व त्यांनी या पद्धतीने लागवडीस प्राधान्य दिले.

अडीचशे शेतकऱ्यांचा सहभाग या उपक्रमात सुमारे अडीचशे शेतकरी सहभागी झाले आहेत. या शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस सेंद्रिय पद्धतीने पिकविला आहे. हा ऊसगाळप झाल्यानंतर सेंद्रिय साखरनिर्मितीही केली जाणार आहे.

आम्ही जमिनीची सुपिकता कायम राखण्यसाठी सेंद्रिय उसाच्या लागवडीबरोबरच सेंद्रिय साखर निर्मितीचा धाडसी प्रयोग यंदा करीत आहोत. येत्या काही दिवसांत उसाचे गाळप झाल्यानंतर रिकव्हरी, साखर उत्पादन याबाबी सामोऱ्या येतील. यानंतर दर किती मिळतो, या बेतावर भविष्यात सेंद्रिय पद्धतीने ऊसलागवडी किती प्रमाणात वाढवायच्या, हे ठरविणार आहोत. - गणपतराव पाटील, अध्यक्ष, श्री दत्त साखर कारखाना शिरोळ, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT