लासलगावात कांदा लिलाव ठप्प
लासलगाव, जि. नाशिक : माल वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप सलग चौथ्या दिवशीदेखील सुरू आहे. खरेदी केलेला शेतीमाल बाहेरगावी पाठवता येणार नसल्याने लिलावात सहभागी न होण्याचा व्यापारी वर्गाने निर्णय घेतला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपासून (ता.२४) कांदा, धान्य लिलाव बंद असल्याने ६ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज एक हजारांहून अधिक वाहने लिलावासाठी येत असतात. दररोज लासलगाव बाजार समितीमध्ये १७ ते २० हजार क्विंटल कांद्याची आवक होत असते. मात्र, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल पाठवण्याची व्यवस्थाही ठप्प असल्याने बाजार समितीतून खरेदी केलेला शेतमाल हा बाहेर पाठवणे शक्य नसल्याने संपूर्ण बाजार समितीत शुकशुकाट दिसत होता. संप लवकर न मिटल्यास येत्या काही दिवसांत कांद्याचा तुटवडा निर्माण होईल. परिणामी, कांद्याचे बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.
शेतकरी वर्गाने आपला शेतमाल टप्प्या-टप्प्याने विक्रीस आणावा जेणेकरून शेतमालाला चांगला भाव मिळेल, असे जयदत्त होळकर म्हणाले. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी बुधवारपासून (ता.२५) व्यापारी वर्गाने कांदा लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी (ता.२४) सायंकाळी घोषणा करण्यात आल्याचे मनोज जैन यांनी सांगितले.