पांढुर्ली उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू
सिन्नर, जि. नाशिक (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली येथील उपबाजार आवारात बुधवारी (ता. २५) गोणीबंद कांदा लिलावास सुरवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी २१५० गोण्या आवक झाली, तर ११५० ते १४०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.
सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता कांदा लिलाव पुकारण्यात आले. या उपबाजार आवारात यापूर्वी एकच अडत सुरू होती. शेतीमालास चांगला भाव मिळण्याच्या हेतूने बाजार समितीने आणखी एक अडतीसाठी जागा लिलावासाठी उपलब्ध करून दिली. पांढुर्ली आवारात यापुढे दोन अडते कामकाज करतील, त्यामुळे भावाची स्पर्धा निर्माण होणार असल्याकडे सभापती तांबे यांनी लक्ष वेधले.
आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार असे ३ दिवस कांदा शेतीमालाचे लिलाव सुरू राहतील. बुधवारी पहिल्या दिवशी पळसे येथील शांताराम गायखे या शेतकऱ्याने आणलेल्या २५ गोण्या १४०० रुपये क्विंटल दराने खरेदी करण्यात आल्या. अरुण हारक, प्रभाकर हारक, विष्णू हारक, दिलीप हारक, विशाल हारक, बाळासाहेबभोर, अरुण वाजे, भरत आरोटे, अनिल शेळके, अंबादास भुजबळ, सुखदेव हगवणे, सोमनाथ दळवी या वेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपला कांदा, शेतीमाल प्रतवारी करून दुपारी ३ वाजता पांढुर्ली उपबाजार आवारात विक्रीसाठी आणावा, व्यापाऱ्यांनी शेतीमाल विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना रोख स्वरुपात अदा करावी, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या.