आरक्षणासाठी आता ‘ठोक मोर्चा’ काढणार
नाशिक : देवेंद्र फडणवीस सरकार मराठा आरक्षणासह, शेतकरी, कामगार आदिवासी, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविण्यास सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. राज्यात प्रश्नांचा डोंगर असताना आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार फडणवीस सरकारला उरलेला नाही. त्यामुळे यावर्षी मुख्यमंत्र्यांना महापूजा करून देणार नाही, असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे.
केवळ आश्वासनांशिवाय समाजाच्या हातात काहीही मिळालेले नाही. त्यामुळे आता लेखी आश्वासनाशिवाय कोणत्याही परिस्थितीत मराठा समाज मागे हटणार नाही. नाशिक जिल्ह्यासह राज्यातून लाखो मराठा समाजाचे स्वयंसेवक पंढरपूरला रवाना होणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे छावा क्रांतीवर संघटनेचे करण गायकर व अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश संपर्कप्रमुख तुषार जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा क्रांती मोर्चाने आता ‘मूक’ मोर्चा ऐवजी ‘ठोक’ मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. परळीतून या आंदोलनाला सुरवात झाली असून, पंढरपुरात मराठा समाज व शेतकऱ्यांचा विरोध झुगारून मुख्यमंत्र्यांनी महापूजा केली, तर होण्याऱ्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही त्यांनी ठेवावी, असा इशारा मोर्चातर्फे देण्यात आला.
भरतीप्रक्रियेला स्थगिती द्या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर आरक्षित जागांवर भरतीप्रक्रिया घेण्याचे दिलेले आश्वासन फसवे असून, मराठा समाजाला डावलण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप करतानाच मराठा आरक्षणाचा निकाल येईपर्यंत भरतीला स्थगिती देण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
मुख्यमंत्री बदला, भाजपाला इशारा भाजपाने नितीन गडकरी अथवा अन्य कोणी सक्षम व्यक्तीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसवावे, परंतु मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्रांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
आमदारांना फिरू देणार नाही
मराठा समाजाचे सुमारे १४५ आमदार विधिमंडळात मूग गिळून गप्प बसले. मराठा समाजाला आरक्षण डावलून राज्यात भरती प्रक्रिया राबविली गेली, तर मराठा समाजाच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही या वेळी देण्यात आला.