क्रांतिदिनी अहिंसक मार्गानेच चक्का जाम
नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेले ९ आॅगस्टचे राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने करण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे. क्रांतिदिनी राज्यभरात होणाऱ्या या चक्का जाम आंदोलनात कोणती अनपेक्षित घटना घडून नये, यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे शुक्रवारी (ता. ३) सिद्धपिंपरी येथे बैठक घेण्यात आली.
सिद्धपिंपरी पंचक्रोशीतील मराठा समाजाच्या नागरिकांसह संपूर्ण तालुक्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेऊन मराठा आंदोलनाविषयी भूमिका स्पष्ट केली. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन समन्वयकांनी या वेळी केले. आंदोलनाच्या काळात मराठा समाज कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करेल. त्याचप्रमाणे प्रशासनानेही सहकार्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत या वेळी अनेकांनी व्यक्त केले.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, गणेश कदम, उमेश शिंदे, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, मनोरमा पाटील, मंगला शिंदे, रोहिणी दळवी, जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, माजी जिल्हा परिषद भाऊसाहेब ढिकले, माजी सभापती अनिल ढिकले, उत्तम राजोळे, शंकर ढिकले आदी उपस्थित होते.
दरम्यान, आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती देऊन हुतात्मा झालेल्या समाजबांधवांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चक्का जाम आंदोलन ९ आॅगस्टला सकाळी १० ते ५ वाजेदरम्यान होणार अाहे. या वेळी हिंसाचार होणार नाही, याची काळजी समाजबांधवांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.