धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा
जळगाव : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी मध्यम व जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला आहे. परंतु, पूर्व भागातील रावेर, मुक्ताईनगर, यावल येथे मात्र भुरभुर पाऊस झाला आहे. ढगाळ वातावरण कायम असून, कीड, रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी कामाला लागले आहेत.
हतनूरचे चार दरवाजे उघडे तापी नदीवरील मुक्ताईनगरनजीकच्या हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडे केले आहेत. त्यातून ३६७२ क्सुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर उजव्या कालव्यातूनही ४०० क्सुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रावेरमधील अभोरा, सुकी, मंगरूळ प्रकल्पातील जलसाठा वाढलेला नाही.
गिरणा धरणाचा साठा मागील १० - १२ दिवसांत सहा टक्क्यांनी वाढून तो १६ टक्क्यांवर पोचला आहे. तर वाघूर धरणाचा साठा दीड टक्क्यानी वाढून तो ३४.९७ टक्के एवढा झाला आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये गणल्या जाणाऱ्या मन्याड, भोकरबारी, अग्नावती, बहुळा, मन्याड, अंजनी या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे.
शुक्रवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंतचा जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव १४, यावल ६, रावेर ७, भुसावळ ९, बोदवड ५, मुक्ताईनगर ८, पाचोरा १३, चाळीसग १४, भडगाव ११, अमळनेर ११, पारोळा ९, धरणगाव ९, एरंडोल १२, जामनेर ११, चोपडा ८, सरासरी ४० टक्क्यांवर पाऊस झाला आहे.